१७ ऑक्टो, २०१५

सावरकरांचा बुद्धिवाद


सावरकरांचा बुद्धिवाद 

महाराष्ट्राचे गमतीदार विचार विश्व 



सावरकरांचे  गायीबद्दलचे विचार एकिकडे - त्यांचे हिंदुत्व दुसरीकडे , मुस्लिम विरोध एका टोकाचा आणि १८५७ च्या पुस्तकातली इस्लाम स्तुती दुसर्या टोकाला , वेद हे पाच हजार वर्ष जुने ग्रंथ असतील तर ते पाच हजार वर्ष मागासलेले ग्रंथ आहेत असे म्हणणारे बुद्धिवादी सावरकर एका बाजुला आणि  हिंदुसभेचे  अध्यक्ष दुसर्या बाजूला !

महाराष्ट्राच्या गमतीदार विचार विश्वाला सावरकर विचार विसंगत वाटतात ! पण ते योग्य नाही !
  
नवे शिकत सतत विचार बदलत जाण्यात काहीच चूक नाही .  भारतीय विचारपटलावर  सावरकर नावाचा बुद्धिवादी त्याच्या प्रज्ञेने चमकून उठला पण कालगतीत त्यांचा बुद्धिवाद मात्र विस्मृतीत गेला. आज जे हिंदुत्व वादि  सावरकरांना पूज्य मानतात ते बुद्धीवादाशी दूरान्वयेही संबंधित नाहीत आणि पुरोगामी म्ह्णविणार्याना सावरकरांशी सोयरसुतक नाहि. हि गमतीची परिस्थिती का बरे उद्भवली असावी ?   सदर लेखात या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे. 

महाराष्ट्राच्या विचार विश्वात मोठ मोठी आंदोलने झालेली आहेत. विद्रोह इथे नवा नाही. पण धर्म  संस्कृतीचे जू फेकून देऊन कोणतीही पुरोगामी परंपरा शोधण्याच्या भानगडीत न पडता,  नीतिमत्तेचे निकष आपण ठरवू पाहतो काय ? हा विचारार्ह प्रश्न आहे.  


बुद्धिवाद म्हणजे काय

  इस्लाम हि  विचारधारा आपण उदाहरण म्हणून घेउ.  इस्लामी पंडित योग्यतेचे निष्कर्ष कुराण पाहून ठरवणार आहे. बुरखा घालावा कि नाही ? याचे उत्तर शोधण्यासाठी कुराणाकडे चला अशी हाक इस्लामी धर्म पंडित देईल . बहुसंख्य इस्लामी  पंडित कुराणा नुसार बुरखा घातलाच पाहिजे असे आग्रही मत मांडतील. काही मोजके इस्लामवादी कुराणातल्या आयतिंचे (श्लोकांचे) उलट सुलट अर्थ लावून - बुरखा घातला नाही तरी इस्लामला चालते ! अशी भूमिका घेतील . या प्रकारच्या मोजक्या इस्लामवाद्यांना महाराष्ट्र  पुरोगामी म्हणत असतो.  हमीद सारखा एखादा अपवाद सोडता पुरो आणि प्रतिगामी मुसलमान योग्य अयोग्यतेचे निष्कर्ष कुराण पाहून ठरवणार आहेत. बुरखा घालावा कि नाही ?  याबद्दल वेग वेगळी मते पहावयास मिळतील. पण त्याचा आधार मात्र कुराणात शोधला पाहिजे यावर एकमत आहे. कुराण वाद मान्य आहे . मतभिन्नता फक्त त्यातील अरबी शब्दांच्या अर्थाबद्दल आहे  .  हा बुद्धिवाद नाही . ग्रंथ प्रामाण्य आहे . 

 महात्मा गांधी, दयानंद सरस्वती,  विवेकानंद  यांनीहि  बहुतांश वेळा हिंदु धर्मातील सुधारणांबाबत अशीच ग्रंथ प्रामाण्य वादि भूमिका घेतली आहे. हा बुद्धिवाद नाही .   

सावरकर म्हणतात " सर्व   धर्म ग्रंथांचे  स्थान  ग्रंथालयातिल कपाट ! आज कसे वागायचे त्याचा निर्णय आम्ही बुद्धीने घेऊ ! राम आणि कृष्ण , गीता आणि वेद हे वंदनिय पूजनीय आदरणीय ग्रंथ ! आज आचरणीय नाहीत , अनुकरणीय नाहीत !!" 

नीतीमत्तेचे निकष कोणते असावेत ? धर्म ग्रंथ नव्हे बुद्धी ! असे जो म्हणतो त्यास बुद्धिवादी असे म्हणता येइल. श्रुति (वेद)  स्मृती  पुराणोक्त आचार धर्माचा विध्वंस हवा अशी सावरकरांचि गर्जना आहे.


बुद्धिवाद  आणि हिंदुत्व वाद 



बुद्धिवादी मनुष्य धार्मिक असू शकत नाही ,  रुढार्थाने हिंदुत्व वादि हि असू शकत नाही.  तरीही बुद्धिवादी सावरकर हिंदुत्व वादी कसे काय झाले ? याचे आकलन झाल्याशिवाय   त्यांच्या बुद्धीवादाचे आकलन होणार नाहि. नवे शिकत सतत विचार बदलत जाण्यात काहीच चूक नाही . मते बदलणे- नवे शिकणे हा बुद्धीवादाचाच एक आयाम आहे.  सावरकरांचे विचार कालानुक्रमे पाहू . १) समाजवादी क्रांतिकारक, २) अंदमानचे नास्तिक , ३) रत्नागिरीचे समाजसुधारक आणि ४) हिंदुत्वाचे भाष्यकार या त्यांच्या आयुष्यातल्या चार टप्प्यावर त्यांनी बुद्धिवाद , धर्म आणि हिंदुत्व याविषयी व्यक्त केलेली मते पाहुया.  


१ ) समाजवादी  क्रांतिकारकांचा राजपुत्र  : साल १९०७ वय वर्ष 

१९१० पर्यंत  सावरकरांचे  मुख्य सहकारी  समाजवादी होते. मादाम भिकाजी रुस्तुम कामा यांनी स्टुटगार्ड च्या आंतर राष्ट्रीय परिषदेत स्वतंत्र भारताचा नवा  ध्वज फडकावला होता .  या  तत्कालीन ध्वजाचे  करते डिझायनर सावरकरहि  होते . हि  स्टुट्गार्ड ला भरलेली समाजवादी परिषद होती . (२२ ओगस्ट १९०७) .



मादाम भिकाजी रुस्तुम कामा 




हिंदु , मुस्लिम आणि बौद्ध यासाठी तीन रंग , हिंदु मुस्लीम एकतेसाठी  सूर्य चंद्र आणि तत्कालीन भारतातील आठ प्रांत (प्रोव्हिन्स ) दर्शवणारी आठ कमळे असा हा सर्व धर्म समभावी ध्वज -  हिरव्या रंगाचे स्थान सर्वात वर आहे


याकाळात  सरोजनी नायडुंनि - क्रांतीकारकांचा राजपुत्र  असे संबोधन सावरकरांना वापरले होते. ते एक सार्वत्रिक समकालीन आकलन होते.

अभिनव भारत हे नाव सावरकरांना मेझीनिच्या यंग इटाली वरून सुचले आहे. अभिनव भारत संस्थेने इंग्लंड बर्यापैकी दणाणून सोडले होते . मेझिनी हा लोकशाहीवादी आणि समाजवादा कडे कल  असलेला विचारवंत आहे.  सावरकर लंडन मध्ये शिकत असताना शामजी कृष्ण वर्मांच्या संपर्कात आणि संस्थात एकरूप होते . शामजी कृष्ण वर्मा हे इंग्लंड मधील समाजवादी , मुक्त चिंतक (फ्री थिंकर्स ) उदारमतवादी युरोपियनांच्या  चांगलेच संपर्कात होते . या गटात अनेक मुस्लिम क्रांतिकारी सामील होते . मिर्झा अब्बास , असफ अली , सिकंदर हयात खान यांच्याशी सावरकरांचा परिचय आणि मैत्री याच काळात घडली आहे . मिर्झा अब्बास यांनी इंग्लंडमधुन भारतात पिस्तुले पाठवण्याच्या कामी सावरकरांना सहाय्य केले होते . असफ अलिंनि  आपल्या मित्राचे वर्णन करताना लिहिले आहे " सावरकर हा माणुस तलवारीच्या धारी सारखा तल्लख आणि   पर्वतावरच्या धबधब्यासारखा  अस्वस्थ आहे. जेमतेम वीस  वर्षाचा हा देशभक्त त्याच्या संपर्कात येणार्या  प्रत्येक व्यक्तीच्या मनावर गारुड घालत  जातो  " संदर्भ :(5 Stormy years: Srivastav Pg 25,1983 ).

 

अभिनव भारत संस्थेचे तरुण क्रांतिकारक

 (डावीकडून )
 
उभे - मित्रा, एम पिटी आचार्य हरनाम सिंग,  सैय्यद हैदर , राजन , गाय अलरेड
बसलेले - व्हीव्ही एस अय्यर , शर्मा ,विनायक  सावरकर , निरंजन पाल , आर एम खान अमीन 

सावरकरांनी इंग्लंड मधून काही ब्राउनिंग पिस्तुले भारतात पाठवली होती. त्यातल्या एकाचा वापर करून अनंत कान्हेरे यांनी कलेक्टर जेक्सन ला यमसदनी धाडले. लंडन येथे  मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला ठार मारले या दोन्ही कारस्थानाचे  सूत्रधार म्हणून अटक झाली . ब्रौनिंग पिस्तुले आणि जहाल शिकवण दोन्हीही सावरकरांची होती.   लहानपणीच घरातल्या त्यांनी अष्टभुजा देवीसमोर स्वातंत्र्यासाथि मारण्या मारण्याची शपथ घेतली होती . भारतात क्रांतियुद्ध पेटवणे हा त्यांना ईश्वरी संकेत वाटत असे. या काळात ते सर्व धर्म समभावी  आणि ईश्वरावर श्रद्धा असलेले आस्तिक होते.  कैद झाल्या नंतर अटकेतल्या  आस्तिक सावरकरांनी क्रांतीकारी मित्रांना लिहिलेले शेवटचे पत्र -  





२) अंदमानचा नास्तिक  : साल १९११ वय वर्ष अट्ठावीस


 १९११ साली सावरकरांना ५० वर्षाची शिक्षा ठोठावली गेली. त्यातली ११ वर्षे सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात काढली आहेत. हि अकरा वर्षे हालाखीची , श्रमाची , कोलूची , विजनवासाची आहेत . येथे सावरकरांच्या राजकीय भूमिकेत प्रक्षोभ आढळतो .  या काळात सावरकरानि   दीर्घ वाचन - लेखन केले.   साहित्य - इतिहास - कविता याबरोबरच सामान्य कैद्यांचा सहवास त्याना लाभला . इथे सावरकर नास्तिक (अज्ञेय वादी) बनतात.

तुरुंगातील कष्ट आणि हाल सोसताना त्यांच्या मनात येऊ  पाहणारे आत्महत्या , सृष्टीचे ध्येय , मनुष्याचे ध्येय आदी विचाराचा बौद्धिक काथ्याकुट करताना ते लिहितात:
"कसले स्वत:चे कर्तुत्व घेऊन बसला आहेस ? तुझे,  त्यांचे, ह्या सर्व मनुष्यजातीचे काय पण ह्या सूर्याचे देखील ह्या प्रचंड विश्वाच्या उलाढालीत तिळमात्र तरी महत्व आहे काय ? " (माझी जन्मठेप २:८४ )
हाच विचार पुढे त्यांच्या एका लेखात अधिक विकसित झालेला  आहे : - " मनुष्य जातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले आणि प्रतिकूल ते वाईट अशी नीती - अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे . देवास आवडते ते चांगले - आणि मनुष्याला  जे सुखदायी ---- तेच  देवाला आवडते----- ह्या दोन्ही समजुती खुळचट आहेत ; कारण त्या असत्य आहेत . " (संदर्भ ६:६)




सावरकर लिहितात : - 

" अकराशे आठ सत्यनारायणांच्या पूजा केल्या तरी ऐहिक यश मिळणार नाहि. …. सारे जग निर्देव करू निघालेला रशिया आज परम बलिष्ठ म्हणून यशस्वी झालेला आहे. …. श्रीकृष्णाची द्वारका समुद्रात बुडाली , प्रत्यक्ष मादिनेतली मशीद घोडशाळा बनली  , जेहोवा चे सुवर्ण मंदिर तडकले , जीजसला रोमने कृसिफाय केले । रामास हराम समजणारे सुद्धा वैज्ञानिक बळाने यश मिळवू शकतात.….  अद्ययावत वैज्ञानिक सामर्थ्य संपादावे … चळवळीत ते  सामर्थ्य असेल तर भगवंताच्या अधिष्ठानावाचून काही अडत नाही. ते सामर्थ्य नसेल तर कोटि कोटि जप केले तरी काही फरक पडत नाही . हाच सिद्धांत !''   (संदर्भ ६:१३)

अंदमानातला छळ ,  मानसिक त्रास, विजनवास, दीर्घ एकांत, चिंतन यातून सावरकर नास्तिकते कडे झुकू लागतात . आणि सर्व धर्मांची चिकित्सा करू लागलेले दिसतात. हे त्यांचे तत्वचिंतन आहे. मनुष्याचा देव त्यांनी नाकारला आहे आणि विश्वाची आद्यशक्ति (देव) म्हणून वैज्ञानिक नियम ग्राह्य मानले आहेत .
(संदर्भ : ६:६)

###############################################
न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिकः ।
नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिकाः ॥

स्वर्ग नाही, मोक्ष नाही, परलोकीचा  आत्मा नाही 
वर्ण -आश्रम ,  कर्मकांडे फळ  तुला  देणार नाहीत ।। - चार्वाक 
###############################################



काशितली दोन सम्मेलने

२००१ साली प्रकाशित झालेल्या समग्र सावरकर वाड्:मयाच्या पाचव्या खंडातल्या १९८ व्या पानावर  सावरकरांचा एक विनोदी  लेख आहे . त्याचे नाव काशितली दोन सम्मेलने : माकड महासंमेलन आणि भाकड महासंमेलन .  काशी नगरीस ज्ञानवापी असेही म्हणण्याचा प्रघात आहे . तर काशीला ब्राह्मणांचे एक संम्मेलन   भरले होते . श्रुती स्मृती पुराणोक्त धर्म आज लागू आहे काय ? या विषयाचा निवाडा लावण्यासाठी हे आयोजन होते .  त्याचवेळी सावरकरांनी हा लेख लिहिला आहे .  तात्याराव सावरकरांनी आपले एक "" मनकवडे ""  नावाचे काल्पनिक वार्ताहार काशीच्या ज्ञानवापिस पाठवले.……  





तर श्री मनकवडेना दोन संमेलने दिसली --- पहिले संमेलन माकडांचे होते . काशीस पूर्वी माकडे मुक्त संचार करत . अद्वातद्वा उड्या  मारीत शेपटीने झाडास लोंबकाळित --  भू:भु:क्कार करीत माकडांचे दिवस सुखात चालले होते . मग एके दिवशी काशीच्या ज्ञानवापीत वीज आली. विजेच्या ताराही आल्या . विजेच्या ताराना  शेपटी लागल्यावर विजेचे झटके  आणि चटके बसू लागले. मग माकड महासंमेलनात एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला . कि विजेच्या ताराना शेपटीने लटकावे का ? काही माकडे म्हणाली " छट्ट  हा प्रश्नच गैरलागू आहे . विजेच्या तारा नावाचा काही पदार्थ असता तर आपल्या त्रिकालदर्शी पूर्वजांनी माकड-स्मृतीत तसे लिहिले नसते काय ? ज्या अर्थी माकडस्मृतीत वीज नाही तर ती आताही अस्तित्वात असू शकत नाही.  शेवटी बराच गिचगीचाट झाला. माकडी भाषेतल्या दुरगम्य चर्चेतून असे निष्पन्न झाले कि - 

परिस्थिती बदलली आहे तेव्हा माकड स्मृतीत बदल केला पाहिजे………………………

 त्याच वेळी अज्ञान वापिस ब्राह्मणाचे दुसरे संमेलन भरले होते त्याचा निष्कर्ष आला कि परिस्थिती हा शब्दच धर्म बाह्य आहे . अधम धर्म विरोधी आहे . शुद्ध संस्कृत भाषेत ओरडतगिल्ला करत …  असा ठराव पास झाला कि परिस्थितीचा पालट विचारात घेणे हा धर्मद्रोह आहे . पाखंड आहे …………… लेखाचा समारोप करताना सावरकर लिहितात " या ब्राह्मण संमेलनातील ठरावामुळे डार्विनच्या उत्क्रांतीवादास मोठाच धक्का बसला . प्राप्त परिस्थितीत माकडाचा विकास होऊन माणुस झाला…. यापेक्षा माणसाचा विकास होऊन माकडे निर्माण झाली हेच मान्य करणे क्रमप्राप्त आहे. अज्ञान वापितले पंडित धर्म संमेलन हेच दर्शवते !"  

ग्रंथ प्रामाण्य आणि श्रुती स्मृती पुराणोक्त आचार धर्माचा सावरकरांना विध्वंस करायचा आहे . 


 ३) रत्नागिरीचा समाज सुधारक : साल  १९२४ वय वर्ष एक्केचाळीस

 अंदमानात सावरकर नास्तिक बनू लागले पुढे धर्म चिकित्से कडे वळले.  प्राप्त परिस्थितीत हिंदूची जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता सावरकरांना मोडायची आहे. सात स्वदेशी बेड्या मोडल्याशिवाय हिंदुना राजकारणात भविष्य नाही असे सावरकर म्हणतात . या सात बेड्यात  रोटिबंदि , वेदोक्त बंदि वगैरे आहेतच पण त्यातली एक बेडी बेटि बंदीची आहे. त्यांनी  या काळात आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केलेला दिसतो .

सावरकरांनि  या काळात हिंदु संघटना हा शब्द आजच्या धार्मिक अर्थाने वापरलेला नाही . जाति  हि विस्कळित अव्यवस्था संपवुन हिंदुना संघटित करुया अशा  अर्थाने वापरला आहे . याच अर्थाने बासाहेब आंबेडकर किवा गांधिनिहि हिंदु संघटना हा शब्द या काळात वापरलेला आहे.



सदर चित्र सावरकरांनी रत्नागिरीत केलेल्या कामाचे वर्णन करणारे समकालीन चित्र आहे. आजची रत्नागिरी असे चित्राचे नाव आहे . 
   

सदर चित्रात हिंदु संघटना नावच्या देवीच्या हातात   विज्ञान नावाचा परशु दिसतो. पोथीजात जातिभेद नावाचा राक्षस हि देवी मारते आहे !  या काळात सावरकरांनि  लिहिलेल्या पुस्तकांची - लेखांची नावे सुद्धा बरेच काही सांगुन जातात . विज्ञान निष्ठ निबंध , जात्युच्छेदक निबंध , अंधश्रद्धा निर्मूलक कथा , क्ष किरणे अशी त्यांच्या संग्रहाची नावे आहेत . जातिभेदाचा पाया वंशवाद आणि पोथिनिष्ठा आहे. " अनुवंश छे ! आचरटपणा !!  " नावाच्या लेखात सावरकरांनि वंशवादि  जन्मजातिचा धुव्वा उडवला आहे .

दोन शब्दात दोन संस्कृती या लेखात पोथिनिष्ठे  बाबत ते  लिहितात : -

" तो युरोप प्रत्यही अधिक काही शिकून अधिक शहाणा होत आहे . बापाहून शहाणा निघालोच कि नाही ? म्हणुन हुन्कारत आहे . बापाला जे कळत नव्हते ते शिकलो । तर बापाचे बापपण काय उरले? ... हि आमची भीती !
हिंदूसंस्कृतीचे महासूत्र म्हणजे स्मृतीश्रुती पुराणोक्त हेच होय ! आजच्या युरोपियन संस्कृतीचे ' अद्यायावत '.... त्याच्या अगदी उलट ! ते पूजक " आज" चे  आम्ही "काल" चे । ते "ताज्या" चे भोक्ते आम्ही "शिळ्या" चे ! एकुण पाहता युरोपियन संस्कृती "अद्यतन"  आमची "पुरातन !
 धर्मग्रंथ पाच हजार वर्षापूर्वीचा धरला तरीही पाच हजार वर्ष मागासलेला ! जग पाच हजार वर्ष पुढे गेलेले .....परंतू अजूनही आजचे विज्ञान न शिकता .....पाच हजार वर्षापुर्वीच्या शहाण पणाहुन  - अधिक शहाणे व्हायचेच नाही असे आम्ही ठरवून बसलो आहोत .
प्रकृती आणि काळ हि असा.... त्या स्वत:स अपरिवर्तनीय आणि त्रिकाल बाधित समजणार्या धर्मग्रंथांच्या ताडपत्रांचा चुराडा उडवीत …सारखा स्वच्छंद धिंगाणा घालीत असता .......त्या ग्रंथांच्या शेवटच्या अक्षरापलिकडे पाउल टाकायचेच नाही …. असा मूर्ख हट्ट धरणार्या लोकांची संस्कृती त्या त्या धर्म ग्रंथाच्या..... प्राचीन मागास संस्कृतीपेक्षा कधीही अधिक विकासु शकणार नाही ..... हे वेगळे सांगायला नको ! " (संदर्भ : ६:६५)   


रत्नागिरीतील सहभोजन 

 सावारकरांनी  अनेक जुनी मंदिरे दलितांना उघडी करून दिली होती , काही आंतरजातीय विवाह लावून दिले होते हे  पतित पावन मंदिरापेक्षा अधिक महत्वाचे आहे. डॉ आंबेडकरांच्या काळाराम  मंदिर प्रवेश सत्याग्रहाला सावरकरांनि  पाठिंबा दिला होता.

डॉ  आंबेडकरांनी या  कामाबद्दल सावरकरांचे  कौतुक करणारे पत्र लिहिले होते.  आंबेडकर लिहितात -
 " नुसति अस्प्रुश्यता जाउन भागणार नाही . चातुर्वण्याचे उच्चाटन झाले पाहिजे . ज्या थोड्या लोकांना ह्याची आवश्यकता पटलि आहे , त्यापैकी आपण एक आहात हे सांगावयास मला आनंद वाटतो " . (कीर लिखित आंबेडकर चरित्र पृष्ठ २३९, सहावी आवृत्ती )
जाती , भाषा , वंश , प्रांत यापलीकडे जाउन हिंदु समाजाने विज्ञान निष्ठ व्हावे , एकसंघ व्हावे असे विचार सावरकरांनी माडले आहेत . असाच बुद्धिवादाचा उपदेश   या काळात  त्यांनी मुस्लिमांना हि केला आहे . अतातुर्क केमाल पाशाने तुर्कस्थानात पुरोगामी सेक्युलर अशी राजवट आणली होती . मुस्लिम पुरोगाम्यात केमाल चे स्थान कोहिनूर हिऱ्यासारखे आहे. केमाल चे कौतुक करताना सावरकर लिहितात -

"धर्म निराळा , निर्बंध (कायदा ) निराळा , एक शब्दनिष्ठ श्रद्धेचा प्रांत , एक प्रत्यक्ष निष्ठ प्रयोगाचा, त्याचा विषय परलोक नि याचा विषय इहलोक " (४:२११)
 रिलिजन आणि स्टेट वेगळे असावेत. धर्माने इहलोकात लुडबुड करू नये. धार्मिक कायदे नको . अशी सेक्युलर (इहवादी)  , विज्ञान निष्ठ भूमिका घेताना सावरकर दिसतात. सावरकरांनी इस्लाम कुराण , मुहम्मद पैगंबर यांची चिकित्सा केलेली आहे पण त्यावर हीन पातळीची टिका केलेली नाही . 

गाय एक उपयुक्त पशू : माता नव्हे ! देवता तर नव्हेच नव्हे !! : सावरकर 

गाय हा एक उपयुक्त पशु आहे . गोमेध वेदातही तुरळकपणे आढळतात. पशुपुजा हीन दर्जाची आहे . पशूचे मूत्र आणि शेण खाणे हि शिवी आहे . श्रद्धा नाही . अशा प्रकारचे सुस्पष्ट विचार सावरकरांनी या लेखात माडले आहेत . 
 या काळात त्यांनी हिंदु  / संघटन वगैरे शब्द   जातिभेद निर्मुलन , विज्ञान निष्ठा,  शिक्षण अशा अर्थाने वापरलेले दिसतात . बुद्धिवाद शिकवणे - भावी भारताची रचना आधुनिक पायावर करणे अशी त्यांची ध्येये  दिसतात. राजकारणात धर्म आणू  नये . विज्ञान निष्ठा बुद्धिवाद शिकवावा म्हणून त्यांनि गायीच्या प्रतीकाची निवड मुद्दाम हून केली आहे .   त्यामागे अतिशय महत्व पुर्ण कारणे आहेत. आधुनिक राज्यशास्त्रातील व्यक्तीस्वातंत्र्य आणि आणी धर्मनीर्बंधाचा निर्णायक सवाल गोहत्या आंदोलना संदर्भात चर्चिला जातो . आणि हे राजकारणाचे एक महत्वाचे वळण असते . त्यातून पुढच्या दिशा ठरतात . एकदा धार्मिक कायदे सुरु झाले कि शरियत चे पाकिस्तान अथवा  स्मृतीचे विषम हिंदुराष्ट्र हा शेवट आहे. रिलिजन आणि स्टेट वेगळे असावेत. धर्माने इहलोकात लुडबुड करू नये. धार्मिक कायदे नको . अशी सेक्युलर (इहवादी)  , विज्ञान निष्ठ भूमिका घेताना सावरकर दिसतात.
  
सावरकरांचे हे असले  विचार बहुसंख्य हिंदुत्व वाद्यांना मान्य होणे शक्य नाही. संघाचे गोळवलकर गुरुजी सुद्धा नाराज झाले होते.  गोळवलकर लिहितात
" सावरकर हिंदु महासभा आदिंचे ….  हिंदुत्व .. निव्वळ प्रतिक्रियावादी आहे... त्यात हिंदु जीवन मुल्यांचा अभाव आहे... आणि  हिंदु सभेला   कोङ्ग्रेसचाच संमिश्र राष्ट्रवाद मान्य आहे " . (विचारधन ५८-५९ भाविसा २००१)  

गोळवलकरांचे आकलन योग्यच आहे !  

मुस्लिम प्रश्न अस्तित्वात नसता तर सावरकरांनी  हिंदुत्वाचे नावही घेतले नसते . तात्यांची जीवनमूल्ये आधुनिक आहेत. आणि हिंदुत्व हे राजकीय भाष्य आहे.  



४)  राजकीय हिंदुत्वाचा जन्म

भारतीय लोकशाहीच्या राजकारणात हिंदुत्व हा शब्द प्रसवण्याचे दायित्व  विनायकाचे आहे ! सावरकर हिंदुत्व वादि होण्यामागे दोन कारणे आहेत : तत्कालीन घटना आणि अभ्यास

१) तत्कालीन घटना : मुस्लिम लीगचा राजकारणातला वाढता जोर, खिलाफत आंदोलन .  मोपल्यांचे बंड , श्रद्धानंद  प्रकरण  

२) अभ्यास  : 
  • इस्लाम धर्म , कुराण याचा अभ्यास सावरकरांनी या काळाच्या आसपास केलेला दिसतो . इस्लाम धर्मात असहिष्णुतेची, धार्मिक हींसेचि,  (शरिया ) धर्मराष्ट्र स्थापनेची आणि काफिर द्वेषाची मुळे आहेत असे  त्यांच्या लक्षात येते . १८५७ चे स्वातंत्र्य समर लिहिताना इस्लामचा गौरव करणारे सावरकर  - आता मात्र सावध भूमिका घेऊ लागतात.  
  • हिंदुंच्या  सनातन  धर्मात असलेल्या मागास कालबाह्य विषम आणि अन्यायी गोष्टी  हळूहळू  त्यांच्या लक्षात येत  होत्या. मोपला बंडात पराभूत हिंदुत  जातिभेद , विषमता , अस्पृश्यता आणि अडाणी पोथिनिश्ठा   भयानक होती हे त्यांना उमजू  लागले .   मला काय त्याचे ?  या कादंबरित या नव्या आकलनाची  साक्ष दिसते . 
यातून सावराकारांचे हिंदुत्व जन्मले. ते धार्मिक नाही . राजकीय आहे .  मुस्लिम आणि ख्रिश्चन नसलेल्या  भारतीय समाजाला  सावरकर हिंदू म्हणतात.  त्यात धर्माचे काही देणे घेणे नाही . ख्रिस्ती आणि इस्लामने  ज्याना काफिर , हिडन , पेगन म्ह्टले आहे त्या भारतीय लोकांना  सावरकर हिंदू म्हणतात ! पुढे त्यांनाच हिंदुराष्ट्र असेही म्हणतात!!

हिंदुमहासभेचे अध्यक्ष : साल १९३७ वय वर्ष ५१ 

बुद्धिवादाकडुन प्रतिक्रियात्मक राष्ट्रवादाकडे सावरकरांचा प्रवास चालु झालेला दिसतो . हिंदु महासभेचे अध्यक्षपद  ते स्वीकारतात. हा पक्ष सनातनि होता . आजही आहे .  हिंदुमहासभेच्या अधिवेशनात साधे  सहभोजन  हि विरोधाशिवाय होत नव्हते . हिंदु महासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका सारांशाने पाहुया  : - (हींदुमहा सभेची अध्यक्षिय भाषणे )
१) एक व्यक्ती एक मत . मुस्लिमांना लोकसंखेच्या प्रमाणाहुन जास्त सत्ता  अधिकार नाही.
२) कॉंग्रेसने राष्ट्रीय रहावे .मुस्लिम  लीग शी लढण्याचे जातीय काम हिंदु सभेने करावे
३) मुस्लिमांना संख्येच्या प्रमाणात  मतदार संघ द्यावेत.
४) फाळणीला विरोध. अखंड हिंदुस्थानचा पुरस्कार.

मुस्लिम लीगचा  दावा होता  कि बहुसंख्य हिंदु लोकसंखेच्या बळावर आपले दमन करतील म्हणून आम्हाला लोकसंख्याच्या टक्केवारिपेक्षा अधिक राजकीय  जागा हव्या . कोङ्ग्रेसला हिंदुसभेच्या घोषणा आणि मागण्या जातीय वाटत होत्या. हिंदु समाज कोङ्ग्रेसचा समर्थक होता . हिंदुसभा आणि सावरकर राजकारणात एकाकी पडु  लागले. त्रस्त आणि संतप्त होऊ लागले .

सावरकर हिंदु महासभेत जायच्या आधी पन्नास वर्ष १८८७ साली सर सय्यदांनि द्विराष्ट्रवाद मंडला होता. हिंदु आणि मुस्लिम हि दोन वेगळी राष्ट्रे आहेत . सत्तेचे वाटप दोन्ही राष्ट्राना समान व्हावे . म्हणून ३०% मुस्लिमाना ५०% राजकीय सत्ता द्या . असा द्विराष्ट्रवादाच्या मागणीचा आशय आहे . सर सय्यद , इक्बाल , जिन्हा या सार्यांनी थोड्या फार फरकाने हीच योजना मांडलि आहे . सावरकरांना द्विराष्ट्रवाद मान्य होता पण सत्तेचे वाटप मात्र  समान नाही अशी त्यांची भूमिका होती !  एक व्यक्ती एक मत असे ते म्हणतात . तात्यांनी केलेला हा व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार आणि धर्मस्वांतंत्र्याचा धिक्कार  आहे!!

इस्लाम धर्मात मुस्लिमांसाठी बंधुभाव उम्मत / इस्लामी राष्ट्राच्या शरियतच्या स्पष्ट संकल्पना आहेत. डॉ आंबेडकरांनी या प्रश्नाचे सखोल विवेचन केले आहे . 




नकाशा : अखंड भारतातली मुस्लिम लोकसंख्येची घनता 

फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५  साली -  बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. --  " पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " ( - Volume 1. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) पान  १४६)

त्यावेळच्या  अखंड भारतातले मुस्लिम लोकसंख्येचे   ~ ३० % हे प्रमाण लक्षात घेतले तर आंबेडकरांच्या लेखनाची खोली लक्षात येते आणि तत्कालीन कोन्ग्रेस किंवा हिंदुसभेला हि  गोष्ट कशी कळली नाही ? याचेही आश्चर्य वाटते .   अखंड भारतात सावरकर मुस्लिमांना लोकसंखेच्या प्रमाणात राजकीय राखीव जागा देत होते. मुस्लिम लीगला हि गोष्ट पटली नाही .  त्याना त्याहून  अधिक जागा आणि सत्तेच्या चाव्या हव्या होत्या . गांधीजिंच्या वाढीव  योजना सुद्धा मान्य झाल्या नाहीत . पुढे फाळणी झाली .भीषण हत्याकांड झाले .  सावरकर उद्विग्न झाले .  

लहानपणिच त्यांनी देशासाठी मरण्याची आणि  मारण्याचीहि  प्रतिज्ञा केली आहे. " देशासाठी मारता मारता मरेतो झुंजेन" अशी प्रतिद्न्या आठ वर्षाच्या विनायकाने घरातल्या अष्टभुजा देवीसमोर घेतली होती .  अखंड भारतमातेवर त्यांचे प्रेम आहे . एखाद्या देवाची पूजा करावी तशी ते त्या भारताची पूजा करत असत . नास्तिक आणि बुद्धिवादी झाल्या नंतरही त्यांची देशभक्ती तशीच राहिली. लाहानपणी मनावर अष्टभुजा आरूढ होती तिचे भारत मातेत रुपांतर झाले .   फाळणी बाबत भूमिका घेताना सावरकर बुद्धिवाद जरासा बाजूला ठेवत देश भक्तीकडे अधिक झुकलेले दिसतात. फाळणी घडून गेली आता अखंड भारत शक्य नाही . योग्यही नाहि. पण   बुद्धिवाद मात्र आजही आवश्यक आहे. 

सावरकर म्हणतात " सर्व   धर्म ग्रंथांचे  स्थान  ग्रंथालयातिल कपाट ! आज कसे वागायचे त्याचा निर्णय आम्ही बुद्धीने घेऊ ! राम आणि कृष्ण , गीता आणि वेद हे वंदनिय पूजनीय आदरणीय ग्रंथ ! आज आचरणीय नाहीत , अनुकरणीय नाहीत !!" 


पुरोगामी आणि हिंदुत्व वाद्यांची गंम्मत !


सावरकरांनि हिंदु आणि मुस्लिम या दोघांनाही असा बुद्धिवाद शिकवला आहे. धर्म ग्रंथाना  वंदन करून ते कपाटात ठेवून द्या आणि कालानुरूप आधुनिक व्हा - हे सावरकरांचे  मत हिंदुनि काही प्रमाणात तरी स्वीकारलेले दिसते . मुस्लिमांनी ते स्वीकारलेले नाही . तसा आग्रह पुरोगामी करत नाहीत . त्यामुळे हिंदुत्व वादि  शक्तींची वाढत चाललेली ताकद पाहून क्रुद्ध होण्यापलीकडे त्यांच्या हाती काही नाही 

.सावरकरांचा  बुद्धिवाद हिंदुत्व वाद्यांनाहि मान्य नाहीच .  एका हातात स्म्रुतिग्रंथ घेऊन , भारतीय परंपरा चातुर्वण्य यावर टिका न करता हिंदुत्व वाद्यांना हिंदु संघटन करायचे आहे. ते केवळ अशक्य आहे. हिंदुच हिंदुत्वाच्या विरुद्ध का उभे राहतात ?  यावर डोके खाजवत बसण्यापलीकडे त्यांच्याहि हातात काही नाहि.  हे द्वैत जोपर्यंत शिल्लक आहे . तोपर्यंत महाराष्ट्राच्या विचारविश्वात अशाच गमती घडत राहणार आहेत ! 

हिंदुच्या हितासाठी त्यांनी धर्म ग्रंथ  कपाटात ठेवून विज्ञान निष्ठेची कास धरली पाहिजे . जे हिंदुबाबत खरे आहे तेच मुस्लिमांबाबत हि खरे आहे. मुस्लिम समाजाला त्यांचे हित सांगणारा आज कोणि आहे काय ?  


या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सावरकरांच्या बुद्धिवादाची उजळणी करणे त्यामुळेच महत्वाचे आहे. 

- डॉ अभिराम दिक्षित 

---------------------------------------------------------------------------
(६:६०)  हा संदर्भ २००१ साली प्राकाशित झालेल्या, समग्र सावरकर वाङ्ग्मयातिल ६ वा खंड आणि ६० वे पान असा वाचावा. इतर संदर्भ लेखात पुर्ण दिले आहेत.  

















  

1 टिप्पणी:

  1. i am confused. in 4 places i sought precis or highlights..विचार in सावरकर ..विज्ञाननिष्ठ निबंध..e.g. प्रत्यक्ष निष्ठ प्रयोग.. सावरकरांवर कुणाचा प्रभाव होता.. rep illa..Kindly Suggest link.

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *