२३ सप्टें, २०१५

वैदिक सुरेख गाणी

 वैदिक होण्यासाठी मासभक्षण सुरापान हे सारे आवश्यक आहे . आगीभोवती बसून मस्त पार्टी आणि मग       त्यात म्हटलेली नादमय सुरेल आणि सुरेख गाणी म्हणजे वेद … संघवाले यात कुठे बसतात ? मी आणि संजय सोनावणि खरे वैदिक आहोत …. (हा कोणाचाही उपहास नाही . सत्य आहे )

आदरणीय संजय दादांना  हे वेद ऋचांचे  स्वैर भाषांतर आहुती म्हणून समर्पण !   मूळ आर्ष  संस्कृत  ऋचा शेवटी दिलेल्या आहेत … वेदकाली वेगळी भाषा होती . ती संस्क्रुत च्या जवळ असली तरी पाणिनीय काटेकोर संस्क्रुत नव्हे ! वैदिक भाषा हि आर्ष म्हणून ओळखली जाते 


१६ सप्टें, २०१५

चार्वाक नावाचा चमत्कार

हजारो वर्षापूर्वी भारतात  विज्ञान  होते का   ?
उत्तर होय असे आहे.
पुराणातली विमाने म्हणजे विज्ञान  नाही . विज्ञान हि विचार करायची पद्दत आहे . त्याला बुद्धिवाद  – अथवा –    विज्ञाननिष्ठा असे म्हणतात. चमत्कार म्हणजे अपुरे  ज्ञान .  प्रत्येक घटनेला कार्य कारण भाव असतो . तो शोधत येऊ शकतो . दाखवता येतो .  म्हणुन प्रत्यक्ष  हेच प्रमाण मानले पाहिजे. असा उद्घोष हजार वर्षापूर्वी  दुमदुमत होता .  आपण अतिशय अभिमानाने जगातल्या पहिल्या बुद्धीवाद्याचे कौतुक केले पाहिजे .
चार्वाक हा प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी विचार येथे होता. हजारो वर्षापूर्वी –  भारतात .
वेदप्रामाण्य धिक्कारामुळे  वैदिक धर्माने त्यांना नास्तिक ठरवले   तर ऐहिक सुखांचा आनंद   शोधल्यामुळे  जैन, बुद्ध अशा  श्रमण मार्गाच्या तत्त्ववेत्त्यांनीही त्यांची कठोर निंदा केली. शरीर पीडेचा  वा दु:ख मुक्तीचा श्रमण मार्ग  चार्वाकाला अप्रस्तुत वाटतो . चार्वाक सुखवादी अहे.चार्वाकाच्या मूळ संस्कृत श्लोकांचे येथे मी मराठि श्लोकात रुपांतर केले आहे. 
————————————————————————————————————————
यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ नास्तिमृत्युरगोचर:।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:।।

जग रे भावा समाधाने – सुखी रहा इहलोकी  ।   
राख झाली देहाची की – उरते ती सारी माती ।।
परिश्रम  कर . पराक्रम कर.  आणि  समाधानाने सुखाने जग . म्रुत्युनंतर  एकदा शरीराची राख झाली कि सारे संपते . पुनर्जन्म चांगला मिळावा या  भितिपोटि  कर्मकांड करत बसू नका . समाधी अवस्था झूट . केवल  ज्ञान थाप . आत्मा बकवास . निब्बाण  अशक्य .
————————————————————————————————————————
चार्वाकाचे  हे उपदेश  विशुद्ध ऐहिक – जडवादी आहेत .त्याला परलोक तुच्छ , वेंद  नको, उपनिषद नको, ब्राम्हण  , अरण्यक – स्मृती इत्यादी ग्रंथ नको.
 बुद्धाच्या अष्टांग मार्गावर त्याचा विश्वास नाही.  जैनाची केवल ज्ञान हि चार्वाकाला  थाप वाटते .   जैन, बौद्ध,  वैदिक या सार्यांची टीका सहन करत आणि त्यांची उलटी खिल्ली उडवत चार्वाक –  भारतात हजारो  वर्षे दुमदुमत राहिले .
शेवटच्या चार्वाकाचा ऐतिहासिक उल्लेख  अकबर बादशहाच्या  काळात आढळतो . हा शहाणा  अकबराची भेट घेऊन त्याला आपली नास्तिकता पटवून देत होता .धर्माची  चर्चा आणि चिकित्सा करण्यासाठी अकबराने इबादतखाना नावाचे नवे ऑफिस उघडल्याचे इतीहासाने नोंदवले आहे. तिथे त्याने सगळ्या धर्माच्या पंडितांशि चर्चा केल्या .   उत्तर आयुष्यात १५८२ साली  अकबराने इस्लाम  धर्म सोडून दिला आणि दिने इलाही नावाचा नवाच  धर्म काढला .त्याच्या  या नव धर्माला –  धर्म ग्रंथच  नव्हता . मौलवी / पंडित हि भानगड पण नव्हती . या  नव धर्म  स्थापनेवर कदाचित चार्वाक  मताचा अंशत: प्रभाव  असावा. अकबर कृत  दिने इलाहीच्या काही मताशी  चार्वाकाचे विलक्षण साम्य आढळून येते .
————————————————————————————————————————
न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिकः ।
नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिकाः ॥
स्वर्ग नाही, मोक्ष नाही, परलोकीचा  आत्मा नाही 
वर्ण -आश्रम ,  कर्मकांडे फळ  तुला  देणार नाहीत ।।
————————————————————————————————————————
————————————————————————————————————————
अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम्‌ ।
बुद्धिपौरुषहीनानां जीविका धातृर्मिता ॥
यज्ञाचे ते अग्निहोत्र, तीन वेद, त्रिदंड , राख फासती अखंड 
बुद्धी आणि पौरुष नाही   –  त्या षंढांच्या पोटाचा  धंदा ।।
————————————————————————————————————————
कर्म करत रहा, फळ अत्ता मागू नकोस, पुढल्या जन्मी तुला ते मिळेलच. त्यानुसार तुझी जात/ वर्ण  ठरेल अन त्यावरून लायकी; ही धार्मीक शिकवण म्हणजे आपला  सुप्रसिद्ध कर्म- फल  सिद्धांत होय . ती त्याकाळची अर्थव्यवस्था सुद्धा आहे . पण त्यात शोषण आहे . आणि ते जन्मजात आहे .  
कर्म सिद्धांत , पुनर्जन्म , चातुर्वण –  वंशशुद्धी व तिच्यामुळे येणारा अहंकार यावर चार्वाकांनी कठोर टीका केली. पुनर्जन्म हा मुर्खपणा मानून हिणवला .  वंशशुद्धी ही वस्तुस्थिती नसून आभास आहे, तो आपले वरिष्ठत्व टिकविण्यासाठी केलेला प्रचार आहे असे चार्वाक मानतात.चार्वाक विचार वेदप्रामाण्य, ईश्वराचे अस्तित्व, पुनर्जन्माचा सिद्धान्त, यज्ञादी कर्मकांडाची उपयुक्तता हे सर्व एकाच वेळी नाकारतो . केवळ ‘प्रत्यक्ष’ हेच प्रमाण मानतो .
बौद्धांचि दु:ख्मुक्तीची धडपड , निर्वाण ,  जैनांचा अनेकांतद – सारी दर्शने   – चार्वाक काहीच  जुमानत नाही. यज्ञाच्या आगीत बुधलाभर  तूप जाळून परलोकाची हाव   धरण्यापेक्षा….  तेच  तूप पिऊन शरीर व मन धष्टपुष्ट आणि  सशक्त  करा – असा जगण्याचा सरळ  साधा सोपा  आणी सुंदर  अर्थ चार्वाकाला अभिप्रेत आहे.
————————————————————————————————————————
कृषिगोरक्षवाणिज्यदण्डनीत्यादिभि: बुधै:।
एतेरैव सदोपायैर्भोगाननुभवेद्भुवि ।।
शहाण्यांनी या जगात शेती, गोपालन, व्यापार, प्रशासन सेवा इत्यादी कामे करून
 मिळालेल्या द्रव्याच्या साह्याने सुखोपभोग घ्यावेत, हाच लोकायतांचा आदर्श आहे.
————————————————————————————————————————
चार्वाक हि प्राचीन नास्तिकांचि भारतीय उपाधी आहे. यात ब्राह्मण आहेत, राक्षस आहेत, दैत्य आहेत, ऋषिमुनी आहेत,राजे महाराजे – गोर गरीब सारे आहेत —- गम्मत  म्हणजे  कधी कधी देव पण आहेत  ! ( ज्याना इथर पोथ्या देवता म्ह्णतात ते) देवांचा गुरू बृहस्पती हा पहिला चार्वाक असल्याचे मानले जाते. शंकर- पुरंदर-  बृहस्पती अशी चर्वाकांची वैचारिक परंपरा सांगितली जाते. हि परंपरा अस्तिकांच्या ग्रंथातुन शोधता येते  . चार्वाक लोक्स ग्रंथ लिहिण्याचा भानगडीत पडले नसावेत किंवा आस्तिकांनि ते ग्रंथ नष्ट केले असावेत .
हे चार्वाक लोक  हजार वर्ष आस्तिकांना धर्माविषयी प्रश्न विचारून भंडावून  सोडत आले आहेत . या प्रश्नावर डोकी खाजवत – त्याचे खंडन मंडन  आणि  त्या चर्चेतून विविध भारतीय दर्शने – श्रद्धा  अणि तत्वज्ञ तयार झाले  असे अनेक अभ्यासक मानतात. चार्वाक विचारतो : –
————————————————————————————————————————
शुश्चेन्निहतः स्वर्गं ज्योतिष्टोमे गमिष्यति ।
स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते ॥
यज्ञामध्ये बोकड मेला – जर तो आता स्वर्गी जाइल   ।
 यजमानाच्या पित्यासाठी मार्ग गवसला आम्हाला  ॥

यज्ञामधे बळी दिलेले बोकड जर स्वर्गात जात असतील तर यजमानाच्या  बापाला त्याच रस्त्याने थेट स्वर्गात का पाठवू नये ?  
————————————————————————————————————————
प्रत्यक्ष हेच प्रमाण. बाकी सब झुट . बाप  दाखव नाही तर श्राद्ध  कर – काल्पनिक थेअर्या चालणार नाहीत . जे प्रयोगात समजले तेच विज्ञान . प्रत्यक्षात दिसले तेच ज्ञान .  प्रत्यक्ष, अनुमान व शब्द या तीन प्रमाणांच्या आधारे घटना, परिस्थिती यांची चिकित्सा करून सत्यासत्यता पडताळून पाहता येते असा सिध्दांत चार्वाकांनी मांडला.
धार्मिक छू छा  मंतर  – वेद मंत्र –  इत्यादी लिहिणारे हरामखोर –   भंड, धूर्त, आणि निशाचर आहेत.असे स्पष्टपणे सांगितले .
————————————————————————————————————————
त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचराः ।
जर्भरीतुर्फरीत्यादि पण्डितानां वचः स्मृतम्‌ ॥
वेदांचे कर्ते भंड, धूर्त, आणि निशाचर   । 
जर्भरी, तुर्फरी, वगैरे अर्थहिन बकवास   ॥
जर्भरी, तुर्फरी असे (निरर्थक) वा आर्ष रानटी शब्द वेदात येतात . त्याची चार्वाकाने चेष्टा केली आहे
————————————————————————————————————————
आज ज्याला नास्तिक बुद्धिवादी विचार  म्हणून जगभर ओळखले जाते –  तो विज्ञान निष्ठेचा  विचार या भारत  भूमीत हजारो वर्षा आधी बहरून उठला होता याचा मला अभिमान आहे. लोकायत म्हणजे इहलोकविषयक प्रणाली. हे चार्वाक लोक अतिशय  नीतिमान होते. मृदुभाषी होते . सभ्य होते .  चार्वाक चे मराठी भाषांतर गोड बोलणारा असे होते.  चारू म्हणजे  गोड, मनाला रुचेल तेच आणि वाक्‌ म्हणजे सांगणारा. 

 धर्म निंदा – ईश्वर निंदा सोडुन –  त्यांचा कोणताही गुन्हा आणि पाप आस्तिकांच्या ग्रंथात सुद्धा नोंदवलेले  नाहीत.  य़ज्ञाचे कर्मकांड, त्यात होणारा वेळेचा व द्रव्याचा नाश आणि त्यातील प्राणी  हिंसा हे चार्वाकांच्या यज्ञविरोधामागील कारण होते. चातुर्वण्य हे संस्कृतीचे अधिष्ठान मानायलाही त्यांचा विरोध होता. युक्तिवाद आणि चर्चा करणार्या  एका चार्वाक पंथी ब्राम्हणाला – तू तर राक्षस आहेस – असे संबोधून आस्तिक ब्राम्हणांनी  जाळून मारल्याची नोंद महाभारतात येते . 

परंतु चर्वाकांच्या हिंसेचे – चोरीचे – खुनशी वृत्तीचे एकही उदाहरण मिळत नाही . एकही नाहि. विरोधकांच्या ग्रंथात हि नाही.  




 जीवनाचे ध्येय | असे सुखप्राप्ती
सुखानेच तृप्ती | माणसांना

– विंदा करंदिकर (चार्वाक दर्शन )




शरीराला आणि इंद्रियाना होणार्या सुखमय भावनाना चार्वाक सुख मानतात . इथे सारा न्याय प्रत्यक्ष हेच प्रमाण असा आहे. मनाला होणारा संतोष  हि त्याना अभिप्रेत आहे. प्रियेच्या बाहुपाशात खरे सुख अशा अर्थाची चार्वाक वचने आहेत. 

जगाला बुद्धिवाद आणि नैतिकता शिकवणारे चार्वाक अतिशय सुखाने स्वत:चे संसारि आणि व्यावसायिक जीवन जगत असावेत असे मानायला जागा आहे. 


 गम्मत म्हणजे काही सवाई चार्वाक देखील तयार होते . लोकायतचे अपडेटेड व्हर्जन म्हणजे :
 तत्त्वोपप्लव सिंह अर्थात विचारावर झडप घालणारा सिंह .

  तत्त्वोपप्लव सिंह हा चार्वाक मताचा एकच ग्रंथ सध्या शिल्लक दिसतो .  त्याचा लेखक  जयराशी भट्ट हा  सातव्या  शतकांत होऊन गेला.  वैदिक, बौद्ध आणि जैन यांच्यावर या ग्रंथात  सडकून टीका केलेली आहे. पण तो चार्वकालाहि जुमानत नाही . इझम किंवा विचारसरणि चूक आहे . अनुभव आणि विवेक बुद्धी माणसाला प्रयत्न पूर्वक मिळवता येते . सर्व लोकांच्या अधिकतर हितासाठी विवेक वापरावा . चार्वाका सकट  कोणत्याही पुस्तकी इझम च्या नादि लागू नका असे जय्रराशी भट्ट स्पष्टपणे सांगतो . चार्वाक मताला जुनाट म्हणणारे नवे चार्वाक जन्माला येत होते . यालाच   विज्ञान निष्ठ विचार  असे म्हणतात .  भारतात लघु रुपाने  का होईना – पण हा विचार होता . हे अतिशय अभिमानस्पद आहे 

आजचे बुवा, बाबा, जटा, दाढ्या –  जनावरांचे मूत्र पिणारा भारत – हे  वास्तव पाहिले कि चार्वाक येथे जन्मावा हे  एक आश्चर्यच वाटते .   जणु चमत्कार !  



(प्रस्तु लेख अनेक संदर्भ ग्रंथ व इंटर्नेट वरील उपलब्ध लेखांवर आधारित आहे .  संस्कृत श्लोकांचे मराठी रुपांतर लेखकाने केले आहे. )


अधिक वचनासाठी संदर्भ ग्रंथ :

चार्वाक – इतिहास आणि तत्त्वज्ञान – सदाशिव आठवले (प्राज्ञपाठशाळा – वाई)
‘आस्तिकशिरोमणी चार्वाक’ – आ.ह. साळुंखे
भारतीय तत्वज्ञान – श्रीनिवास दीक्षित 
लोकायत – स. रा. गाडगीळ – लोकवाङ्मय गृह
वेध चार्वाकाचा – उदय कुमठेकर – अभय प्रकाशन नांदेड.
चार्वाकमंथन – संपादकः उदय कुमठेकर – परामर्श प्रकाशन, तत्त्वज्ञान विभाग्, पुणे 
चार्वाकवाद आणि अद्वैतवाद – डॉ. प्रदीप गोखले – टिळक महाराष्ट्र विद्यापीठ 
लोकायत (इंग्रजी ) – देविप्रसाद चट्टोपाध्याय – 
सर्वदर्शनसंग्रह – माधवाचार्य – प्र. फोटोझिंको प्रेस पुणे, (शासकीय प्रकाशन)
‘भारतीय जडवाद’  –  राममनोहर लोहिया 
‘जडवाद’ – मानवेन्द्रनाथ रॉय ( अनुवाद : बा.र. सुंठणकर  ) कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे 
‘विचारमंथन – स.रा. गाडगीळ 

४ सप्टें, २०१५

सिरीया ते अरबस्तान

( इसीस आणि अन्य मुजाहिदांच्या धर्मयुद्धात वाट फुटेल तिकडे पळणारे निर्वासित . अरबांनी भाईचारा वा इस्लामी उम्मत सुद्धा नाकारता फटकारले गेलेले अभागी जीव . युरोप मार्गे केनडा आणि मग तुलनेने सुधारलेल्या अणि सापेक्षत: सुसंसकृत जगात प्रवेश करण्यासाठी अधीर झालेले कुटुंब . जिवाचा धोका पत्करत समुद्रात नाव लोटते . पण ती फुटते . अभागी तीन वर्षाच्या लेकराचे प्रेत तुर्कस्थान च्या किनार्यावर पहुडलेले दिसते . या घटनेवर आणि निर्वासित प्रश्नावर जगभर फ़ोटो , चित्रे फिरत आहेत . त्यावर हि कविता : सिरीया ते अरबस्तान)








दु:ख आणि दैन्य यांच्या दौलती चोहीकडे
भूक भांडण रौद्र हिंसा - अन्न पाणि आटले
राज्य घेती क्रांति गीते - रक्त बदला दाटला
सूड घ्याया घे प्रतिज्ञा - धर्म आहे माजला


लाथ तख्तावरि, युद्ध हे घरोघरी
कफ़न डोक्यावरी, वीर हे धावती
नारा हा तक्दिरी , गर्जना ते करी
अल्ला हु अकबरी , घेई तो काळजी








इसीस आणिक स्थानिक जंगम
तुंबळ संगर
जिहाद करुया अल्लासाठी
समग्र तांडव


धर्माचे ते राज्य आणुया , शरियत धंदा
हृदयावरती हात ठेवुनी बोले बंदा
या गोर्यांचा काळा धंदा
काफिर गंदा


मुजाहिदांचि फौज चालली जन्नतीकडे
युरोप आणि अमेरिकेला कापरे भरे


वारे शिरले कानात ,
चौखूर उधळला रानात ,
घनघोर उसळला तालात


अरबाचा तो अबलख घोडा, मूर्ती तोडा श्रद्धा ठेवा
अश्म युगिच्या सैतानाने शड्डू ठोकला वाळूत
घनघोर उसळला तालात

----------------------------------------


भूक आणिक अन्न शोधत हे फिरस्ते चालले
धर्म धगीने भाजले
शांततेचे श्वास द्या हो भावकीचे छत्र द्या
आर्ततेने बोलले


इस्लामाची शपथ घालूनी, दारो दारी विनवित
उम्मत गंमत भाईचारा, क्षणोक्षणला तुडवीत






दारिद्र्याचा तांडा चाले त्या गोर्यांचा वेशीत
उपेक्षितांचा धर्म कोणता ? माणुसकीला शोधीत


अन हे वादळ सागर मंडल , नौयानाचे असंख्य तुकडे
डळमळ धांदल तांडव घडले , तुटुन पडले जिकडे तिकडे


शांत झोपला पाण्यात , चिमुकला गोजरा वाळूत
हा अल्लाचा एकाच बंदा , नरकी जगाला , स्वर्गी गेला

झूटी जन्नत , स्वर्गही खोटा शरियत आणि पुराणी धंदा 

या बंद्यासाठी तयार करुया स्वर्ग चिमुकला जिता जगता !



- डॉ अभिराम दीक्षित

(सोबतचे चित्र मुरात सायीन यांचे आहे )





सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *