५ जाने, २०१४

मोरेंचा जिहाद ( त्यांच्या चष्म्यातून भाग २ )

 मोरेंचा जिहाद ( त्यांच्या चष्म्यातून भाग २ )
  


आधीच्या लेखात आपण सम्राट अकबराचा काळाच्या पुढे गेलेला धर्म चिकित्सक दृष्टीकोन पाहिला आहे.  या लेखात  आपण १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातील मुस्लिमांचा सहभाग आणि दृष्टीकोन पहायचा आहे. १८५७ साली धर्मपरायण  मुस्लिमांनी देव , देश आणि धर्म यासाठी दिलेली कडवी झुंज आपण पहाणार आहोत.


पूर्वपिठीका



 सावरकरवादी अशी शेषराव मोरेंचि ख्याती आहे .  प्रा मोरेंना सावरकरांचे आंधळे अनुयायी मात्र म्हणता येणार नाही. १८५७ चा जिहाद हे मोरेंचे पुस्तक याची साक्ष आहे.४०० पानांचे हे पुस्तक तब्बल २०० इंग्रजी , मराठी ग्रंथांचा अभ्यास करून लिहिलेले आहे. पुस्तकातली  एकही ओळ संदर्भाशिवाय लिहिलेली नाही. सावरकरांच्या २५ व्या वर्षी लिहिलेल्या स्वातंत्र्यसमर या ग्रंथात १८५७ मधे हिंदू मुस्लिम ऐक्य झालेले होते असे प्रतिपदित केलेले होते. झाशीची राणी आणि नानासाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली १८५७ चा उठाव झाला असे सावरकरांचे प्रतिपादन आहे .   मात्र १८५७ च्या उठावात मुस्लिमांची स्वातंत्र्यप्रियता आणि इस्लामी बंधुत्व व्यक्त झाले होते - त्याकडे सावरकरांचे दुर्लक्ष झाले आहे . मोरेंचे निष्कर्श सावरकरांशी जुळणारे नाहित. १८५७ चा जिहाद या  पुस्तकातले  मोरेंचे सर्व विचार पटोत अथवा न पटोत पण त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे निश्चितपणे विचार करण्यासारखे आहेत .



  सम्राट अकबर ते १८५७ : मौलवींची गुरुशिष्य परंपरा

अकबराचा सेक्युलर उदारमतवाद धार्मिक मुस्लीमांना  मुळीच आवडला नाही . पण इस्लामच्या धार्मिक परंपरेतहि कडवी स्वातंत्र्य निष्ठा आहेच.

सम्राट अकबर खर्‍या इस्लामपासून मार्गभ्रष्ट झाला आहे. त्याला पदच्युत करण्यासाठी शेख सय्यद अहमद सरहिंदी या महान धर्मपंडिताचा उदय १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात होतो. राष्ट्रीय पुरुष म्हणून त्यांचा गौरव करताना मौलाना आझाद म्हणतात - "सरहिंदीमुळे अकबराच्या गैरस्लामी दिने इलाही चळवळीवर प्राणांतिक आघात झाला व ती कायमची नष्ट झाली". सरहिंदींचे महान विचार होते - राम व रहीम एकत्र मानणे हा मूर्खपणाचा कळस होय. इस्लामचा मान हा कफिरांचा अवमान करण्यात आहे. झिजियाचा खरा उद्देश काफरांची मानहानी करणे हा आहे. सत्यधर्माचा  मार्ग (शरा) हा तलवारीच्या धारेखाली असतो.मुजादिद अल सानि या नावाने इतिहास सरहिंदीना ओळखतो.

अकबराचा मुलगा (सलीम) जहांगीर हा बापाचेच सेक्युलर  धोरण पुढे चालवू पहात होता. त्याविरुद्ध सरहिंदीनी गर्जना केली- " सैन्याने आता जहांगीर बादशहाच्या आज्ञा पाळू नयेत. " आपल्या विचारांचा प्रचार करण्यासाठी सरहिंदींनी शेकडो शिष्य देशभर पाठवून दिलेले होते. जहांगिर भडकला. त्याने सरहिंदींना सरळ बेड्या ठोकल्या. दिल्लीच्या उच्चासनावर बसलेल्या जहांगिराला आपल्या मांडीखाली काय जळतय याची कल्पना नसावी. सरहिंदींच्या शेकडो प्रचारकांनी आपले काम चोख बजावले होते. सैन्यावरील सरहिंदीची पकड असंतोष पैदा करू लागली. झक मारत जहांगिर सरहिंदीना सोडतो; एवढेच न्हवे तर सैन्याचे प्रमूख धर्मोपदेशक म्हणून त्यांची नियुक्ती करतो. इथुन सुरू होतो इतिहासाचा एक वेगळा अध्याय. मुल्ला मौलवींच्या सैन्यावरील पकडीची बखर. धर्मगुरूंच्या राजकीय उलाढालींचा इतिहास. सरहिंदीच्या शिकवणीला आलेले गोंडस फळ म्हणजे शिष्योत्तम औरंगजेब होय.




औरंगजेबाचे राज्य पुढे उताराला लागले. पुढ्चे शतक मुघल साम्राज्याच्या र्‍हासाचे होते. मराठे शिरजोर बनू लागले. सरहिंदींची विचारकूस जन्म देते शाह वलिउल्लाह यांना (१७०३ ते १७६२). पानिपतच्या तिसर्‍या युद्धासाठी अब्दालीला आमंत्रण देताना ते लिहितात - "... थोडक्यात येथील मुस्लिमांची स्थिती शोचनीय झाली आहे. राज्य व प्रशासनाचे सर्व नियंत्रण  काफरांच्या हातात गेले आहे. श्रद्धाहीन काफरांच्या सैन्याला पराभूत करण्यासाठी; हे अमीर ; अल्लाहच्या विनम्र सेवकाची प्रार्थना ऐका". १७६१ चे पानिपत मराठी भाषेत एक वाक् प्रचार बनून उरते पण त्या आधीच १७५७ सालीच प्लासीच्या लढाइत इंग्लंडचा युनियन जॅक डौलाने फडकलेला असतो. आता भारतभर तोच फडकणार असतो. १७६४ च्या बक्सारच्या लढाइनंतर हे चित्र अधिकच स्पष्ट होते. त्यावेळी शाह वलिउल्लाह पैगंबरवासी झालेले असतात. त्यांच्या विचारांचा झेंडा घेउन उभा ठाकतो त्यांचा सख्खा मुलगा. शाह अब्दुल अझीज.


१८०३ साली ब्रिटीश दिल्लीचे स्वामी झालेले असतात. शाह अब्दुल अझीज फतवा जारी करतो - भारत हा आता दार उल हरब (युद्धभूमी) झालेला आहे. त्याला दार उल इस्लाम करणे ओघाने फतव्यात येतेच! दक्षिण आशियाच्या मुस्लिम इतिहासातील सर्वात महत्वाचा व युगप्रवर्तक फतवा म्हणून याचा उल्लेख मुस्लीम अभ्यासक करतात. ब्रिटीशांना हिदुस्थानातून हाकलून द्यावे यासाठी पुकारायचा १८५७ चा जिहाद ह्याच फतव्यातून जन्माला आला  .


 सरहिंदी  चे शिष्य वलिउल्लाह - वालिऊल्लाह पुत्र अब्दुल अझीज चे पटटशिष्य - सय्यद अहमद शहिद - त्यांचे पट्टशिष्य अलिबंधू आणी अलिबंधूंचा पट्टशिष्य म्हणजे बहादुरशहा जफर अशी थेट नाळ जोडता येते.पकिस्तानात ती जोडतात. १८५७ चा उठाव यशस्वी झाल्यास बहादुरशहा जफर हाच हिंदुस्थानचा घोषित सम्राट होता. खुल्क खुदाका, मुल्क बादशहा और अंमल झासी की रानी का अशा टाइपची घोषणा नानासाहेबांनीही दिली होती. १८५७ यशस्वी झाल्यास लोकशाही प्रस्थापित होणार न्हवती किंवा पेशवे हिंदुपदपादशाहीची द्वाही फिरवणार न्हवते. खुल्क कोणाचा ? मुल्क कोणाचा ? आणी अंमल कोणाचा हे आधीच ठरले होते ! मुस्लिम इतिहासकार ही गुरुशिष्य परंपरा फार महत्वाची मानतात. वलिउल्लह यांची चळवळ आज वहाबी म्हणून ओळखली जाते. या वहाबी चळवळीचा  आजही  मुस्लिम  मनावर जबरदस्त पगडा  आहे.  या दोनशे वर्षांच्या इस्लामी गुरुशिष्य परंपरेने १८५७ च्या जीहादासाठि भारताची जमीन नांगरुन भुसभुशीत करून ठेवली होती .


*********************************************************************************************************
१८५७ च्या घडामोडीत वहाबी मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला. ख्रिश्चनांच्या विरुद्ध धर्मयुद्ध इस्लामच्या परंपरेत होतेच ते पुनरुज्जीवित करण्याचा वहाबींचा प्रयत्न होता. वहाबींची चळवळ ही भारतातील ईंग्रज राजवटीची शत्रू होती, यात वादच नाही. पण ती इंग्रज विरोधासाठी जन्मलेली चळवळ नाही. भारतातील मुस्लिमांचे राज्य अबाधित रहावे या प्रेरणेची ती चळवळ आहे. या मूळ प्रेरणेसाठी सुरवातीला मराठ्यांचा विरोध, शीखविरोध आणी नंतर इंग्रजविरोध हे टप्पे आपोआप निर्माण झाले.
नरहर कुरुंदकर (जागर,२४०)
*********************************************************************************************************


  उठावपूर्व स्थिती आणी कारणे :


१८५७ चा उठाव घडण्यासाठी तत्कालिक आणी ऐतिहासिक कारणे दिली जातात.
ब्रिटिशांनी संस्थाने खालसा करणे, आर्थिक पिळवणूक, ब्रिटिशांचा धर्मप्रसार अशी १८५७ ऐतिहासिक कारणे दिली जातात. काडतुसाला गाय आणी डुकराची चरबी लावल्याचे धार्मिक कारण दिले जाते. मुद्दा असा आहे की धार्मिक कारणांनी सर्वसामान्य हिंदू पेटून उठतो काय ? औरंगजेबाच्या सैन्यातले किती हिंदू शिवाजी महाराजांना येउन मिळाले ? अधिकतर संस्थाने कोणाची खालसा झाली होती ? ब्रिटीशांच्या धर्मप्रसाराने कोण अधिक चिडणार होते ? हिंदू की मुसलमान ?

शिवछत्रपतिंचा महाराष्ट्र थंड गोळ्यासारखा का पडला होता? हा उठाव मुख्यतः उत्तर भारतात झाला.  झासी, कानपूर, मीरत, दिल्ली, आग्रा, अलाहाबाद . या ठीकाणी प्रामुख्याने कोणाची राज्ये होती ?

 ब्रिटीशांच्या सैन्याचे तीन विभाग होते. १)मुंबई २) मद्रास ३) बंगाल. सर्व मुख्य उठाव बंगाल तुकडीतच का झाले ? त्यातही त्यात घोडदळच का आघाडीवर होते ? बंगाल घोडदळात कोणाची संख्या लक्षणीय होती ? हिंदू की मुसलमान ?
या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे मोरेंनी प्रस्तुत ग्रंथात लिहिलेली आहेत.




**********************************************************************************************************




१८५७ चा उठाव हा वस्तुतः ब्रिटीशांविरुद्ध मुस्लिमांनी घोषित केलेला जिहाद होता. .. हा उठाव सरहिंदी सय्यद अहमदनी ब्रिटीश राजवटीमुळे भारत "दार उल हरब" झालेला आहे म्हणून जे आंदोलन सुरू केले होते त्याचे पुनुरुत्थान होय. हा उठाव म्हणजे भारताला "दार उल इस्लाम" करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला प्रयत्न होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(समग्र आंबेडकर वाङमय खंड ८ पृष्ठ २९५. महाराष्ट्र शासन)
*********************************************************************************************************



  १८५७ घटना कशा घडत गेल्या. : सावरकर उवाच 



 
१८५७ चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ लिहितेवेळी सावरकर २५ वर्षांचे होते. त्यांनी त्यावेळी इस्लाम धर्माचा अभ्यास केला   न्हवता. जिहादचा नीट अर्थही त्यांना त्यावेळी उमगला न्हवता. त्यामुळे सावरकरांचे या उठावातील इस्लामी द्रुश्टिकोनकडे दुर्लक्ष झालेले आहे. तरीही त्यांच्याच पुस्तकातली काही वाक्ये ह्या उठावाच्या मुलभुत प्रेरणा व्यक्त करतातच. सावरकर लिहितात : -

जानेवारी १८५७ : बातमी पसरली - गायीच्या आणी डुकराच्या चरबीची नवी काडतुसे येत आहेत. ती दातानी तोडावी लागणार आहेत.

जानेवारी ते मार्च १८५७: बातमीबरोबरच क्रांतीचा गुप्त संदेश देणार्‍या चपात्या फिरवल्या जातात.  १८५७ चे स्वातंत्र्यसमर मधे या चपात्यांना उद्देशून सावरकरांनी म्हटले आहे " जा ,हे क्रांतीच्या देवदूता, तसाच पुढे जा ! आपली प्रियतमा तिच्या स्वातंत्र्यासाठी जिहाद करण्यास तयार झालेली आहे....ही शुभवार्ता तिच्या लेकरांना कळवण्यासाठी दहादिशांना धावत जा ! तीरासारखा पुढे जा ! ... हे मायावी देवदूता .... (१८५७ - ७५)

१६ मार्च १८५७ : सादिक अल अखबार या दिल्लीच्या व्रुत्तपत्राची हेडलाईन : पर्शियातील दरबारी लोकांनी आपल्या सम्राटाला सल्ला दिला की आपण ब्रिटीशांविरुद्ध जिहाद करून हिंदुस्थान जींकून घ्यावा. याविषयी सावरकर लिहितात - " १८५७ चे आरंभी दिल्लीच्या मशिदींवरून याच अर्थी सार्वजनिक जाहिरनामे फडकू लागले ! ' फिरंग्यांचे ताब्यातून हिंदुस्थानची मुक्तता करण्यासाठी इराणी सैन्य लवकरच येत आहे. तेंव्हा या काफिर लोकांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी समरांगणात उडी घ्यावी" (१८५७ - ६५). हेच सावरकर उत्तरायुष्यात हिंदुत्ववादी झाले. पुढे उत्तरायुश्यात गांधींनी अफगाणिस्तानच्या अमिराला आवताण धाडले होते तेंव्हा सावरकरांनी पायताण उगारले होते.

# . २९ मार्च १८५७ : मंगल पांडे गोळी झाडतो. मंगल पांडेचे मार्गदर्शक मित्र म्हणून नक्कीखान आणी वहाबी नेता पीर अली याचा सावरकरांकडून गौरवपूर्ण उल्लेख. (१८५७ -६७, २८५)

# .१० मे १८५७ : मीरत चा उठाव (घोडदळाकडून प्रारंभ). बंडखोर कैदी मुक्त. अनेक ब्रिटिशांना कायमची मुक्ती. याविषयीचे सावरकरांचे भाष्य मुळातुनच वाचण्यासारखे आहे !.

# .११ मे १८५७ : बंडखोर सैन्य दिल्लीत दाखल. बहादुरशहा जफर ला बादशहा घोषित केले. आज्ञापत्रांवर बहादुरशहाची राजमुद्रा झळकू लागली. " विजयाचा अधिपती ! धर्माची ज्योत ! इस्लामचा संरक्षक - सम्राट मुहंमद बाहदुरशहा." याविषयी सावरकर लिहितात " बादशहाचे राज्याहरोहण म्हणजे जुन्या मोगल सत्तेची पुनःस्थापना न्हवती. ते हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतीक होते." (१८५७ -२२८)

# .१९ मे १८५७ : दिल्लीतील सर्व ख्रिश्चनांचे शिरकाण त्यानंतर दिल्लीत हिंदूंविरुद्ध जिहादची घोषणा. सावरकर लिहितात - काही माथेफिरू मुस्लिमांनी हिंदूविरुद्ध जिहादची घोषणा केली. (१८५७ - २३०)

# .जून १८५७ : उत्तर भारतात बंडाचा वणवा पेटतो. सावरकर लिहितात - लखनौला तर मशिदी मशिदीतून मौलवींनी जिहाद सुरू करण्यासाठी उघड व्याख्याने देत असावे. पाटणा व हैद्राबाद येथे रात्रीरात्रीतून सभा भरत व निरनिराळ्या मौलवींकडून लोकांस स्वातंत्र्ययुद्धाचे व स्वधर्मयुद्धाचे शिक्षण देण्यात येई. (१८५७ - ६६)

# .१ नोव्हेंबर १८५८ : शिखांच्या मदतीने ब्रिटीश बंड चिरडतात राणीचा जाहिरनामा प्रकाशित. सावरकर - शिखांनी देशद्रोह केला असे म्हणतात. (१८५७ - १२४)

(१८५७ -१२४ हा संदर्भ समग्र सावरकर वाङमय खंड चार १८५७ चे स्वातंत्र्यसमर पृष्ठ १२४ असा वाचावा. वीर सावरकर प्रकाशन, मुंबई. १९६३)

१८५७ च्या उठावात शीख ब्रिटिशांच्या बाजूने लढले म्हणुन सावरकरांनी त्यांना देशद्रोही म्हणुन संबोधले आहे . वास्तव काय आहे ? मध्ययुगीन  धार्मिक प्रेरणांच्या चष्म्यातून याकडे पहावे लागेल . १८५७ बद्दल  शीख अभ्यासकांचे काय मत आहे ? 


शिखांच्या भूमिकेबद्दल सरदार खुशवंतसिंगांचे विचार आहेत  - " मीरत आणी दिल्लीच्या बंडखोरांनी मोगल साम्राज्याच्या पुनःस्थापनेची घोषणा केली. आपल्या वाडवडिलांवर मोगलांनी केलेल्या अत्याचाराच्या कहाण्या एकत वाढलेल्या शिखांचा - बहादुरशहा जफर सम्राट होण्याला तीव्र विरोध होता. शिखांनी दिलेल्या संरक्षणात होडसन या ब्रिटिशाने ने मुघल  राजपुत्रांना ठार केले. शीखांनी त्या बहादुरशहा च्या मुलांची  प्रेते चांदनी चौकात लटकवली ..... त्याच ठीकाणी.... जेथे गुरु तेग बहादुरांना औरंगजेब बादशहाने ठार केले होते.




शिखांनी हा सूड उगवला होता : मेलेल्या मुस्लीमांच्या प्रेतांवर एक एक सपाटे लगावित ते ओरडत होते - हा घ्या गुरु गोविंदसिंगांसाठी... आणी हा ... आणी हा ..आणी हा ... तीन गुरुंसाठी."


ब्रिटिशांचा विरोध म्हणजे देशभक्ती किंवा    स्वातंत्र्य संग्राम म्हणजे हिंदु , शीख या भारतीय धर्मांची मिरासदारी किंवा मुस्लिम -शीख या  धार्मिक अल्पसंख्यांचि एकता या सर्वांकडे वेगळ्या चष्म्यातून पहावे लागेल.




  ऊठावाचे प्रेरक, नायक आणी लाभधारक : हिंदू की मुसलमान ?


मराठि इतिहासकारांनी आणि कादंबरिकारांनि नानासाहेब पेशवे , तात्या टोपे आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई या तिघांना १८५७ च्या उठावाचे प्रेरक मानले जाते . सत्य काय आहे ? त्यांच्याच शब्दात पाहू : -






नानासाहेब पेशवे : २० एप्रिल १८५९ रोजी नानासाहेबांनी ब्रिटिशांना लिहिलेले पत्र प्रामाणिक आणी वीरश्रीयुक्त आहे:

" मी असहाय्य म्हणून बंडखोरांना मिळालो ... सैनिक माझ्या (मूळ) प्रदेशातले न्हवते.... दबावाखातर मला बंडखोरांना मिळणे भाग पडले.... आता माझा नाईलाज आहे. मी तुमच्याशी लढायला तयार आहे.मी एकटाच राहिलो आहे. आपली लौकरच गाठ पडेल आणी त्यावेळी तुमचे रक्त सांडून ते गुढगाभर खोल साचेल. तुमच्यासारख्या सामर्थ्य वान राष्ट्राचा मी शत्रू आहे याचा मला अभिमान आहे. मरण तर एके दिवशी यीलच, त्याला भितो कोण ?"
नानासाहेबांचे हे निर्वाणीचे पत्र  ते कोणत्या परिस्थितीत १८५७ च्या बंडात सामिल झाले ते   दाखवते.

फौजेची घोषणा होती - खुल्क खुदाका, मुल्क बादशहा , हुकुम नानासाहेब और फौज बहादुरका


तात्या टोपे यांनी म्हटले आहे : पायदळाच्या आणि दुसर्‍या घोडदळाच्या तुकड्यांनी आम्हाला घेरले आणी नाना व मला खजिन्याच्या खोलित कैदी म्हणून ठेवले. त्यानंतर बंडवाल्यांनी आम्हाला बरोबर नेले.

झाशीची राणी नाइलाजाने युद्धात पडली पण शेवटच्या हौतात्म्याने भावी पिढ्यांसमोर आदर्ष निर्माण करून गेली.
तात्या, नाना किंवा झाशीची राणी  स्वाभिमानी होते यात शंका नाही; १८५७ च्या उठावात ते नाखुशीने आले पण आपल्या तेजाने झळाळून उठले.

१८५७ सालीच इंग्रज पराभूत झाले असते तर ? या देशात लोकशाही येणार होती काय ? पेशवाई  येणार होती काय ? या प्रश्नात अजून एक प्रश्न आहे..... तर देशाचे भविष्य काय असते ?

हमीरपुरचा अलिबक्ष, बांद्याचा नवाब, मौलाना लियाकत अलि, हाजी इमादुल्लाह, बुलंदशहरचा वलिदाद खान, आग्र्याचा वजिर खान्,अलिगडचा गौस मुहम्मद खान, अयोध्येचा मौलाना अहमदशहा, आझमगडचा मुझफ्फर जहान; गोरखपूरचा मुहम्मद हसन, राहतगडचा नवाब, मुरादाबाद चा मज्जूखान हे या उठावाचे ऊठावाचे प्रेरक, नायक आणी लाभधारक होते.

हिंदुस्थानचा घोषित बादशहा होता : बहादुरशहा जफर



हे छायाचित्र १८५८ चे इंग्रजांच्या कैदेतल्या बादशहाचे आहे. बादशहा शायर होता. बादशहाला कैदेत टाकले. त्याच्या दोन मुलांची शिरे कापून ती त्याच्या समोर पेश करण्यात आली. त्यावेळी इंग्रजांचा एक हुजर्‍या बादशहाला म्हणतो,

"दमदमाये में दम नही अब खैर मानो जान की !
ऐ जफर, ठंडी हुई अब तेग हिंदुस्थान की !!"

त्यावर उसळून डोळ्याचा अंगार फेकीत बादशहाने दिलेला जवाब इतिहास सांगणारा मंत्र ठरला.

"गाजीयों में बू रहेगी जब तलक ईमान की !
तख्ते लंदन तक चलेगी तेग (समशेर ) हिंदुस्थान की !!"

यातल्या गाजी आणी इमान या शब्दांचे  अर्थ लक्षात घेतले पाहिजेत.  उर्दू भाषेत आलेले हे शब्द मुळातले अरेबिक आहेत . आणि इस्लामी संस्क्रुतित हे शब्द त्यांच्या मुळ अरेबिक अर्थानेच वापरले जातात . दुर्दैवाने अरबी भाषेबद्दल बर्याच मराठी इतिहासकारांना जुजबी माहितीसुद्धा नसते .  इमान अर्थात एकमेव श्रद्धा  हि सहा स्तंभांवर उभी  असते . एकमेव ईश्वर अल्लाह ,   कुराण ग्रंथ , अल्लाहचे कुराण प्रेषित मुह्मंदापर्यंत पोचवणारे देवदूत ,कुराण सांगणारे शेवटचे प्रेषित मुहम्मद ,  अंतिम निर्णय दिन आणि जन्नत , जहन्नुम ची अल्ला कृत भविष्यवाणी या सर्व सहा स्तंभांवर निष्ठा म्हणजेच  इमान होय .  इमानदारीत या पृथ्वीवर अल्लाहचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी काफ़िरांना ठार करणारा धर्मयोद्धा म्हणजे गाजी होय . इमानदार बादशाहा बहादुरशहचा उल्लेख गाजी म्हणुन का केला जातो ? हे समजून घेतले पाहिजे.



 उठाव काळातील जिहादी जाहिरनामे

या जाहिरनाम्यांची   संख्या शेकड्यात आहे. विस्तारभयास्तव केवळ बहादुरशहा व नानासाहेबांचे मोजके  जाहिरनामे बघू.

बहादुरशहाचे जाहिरनामे :

  १ )  इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात सामिल होणे हे हिंदू व मुसलमान यांचे अनिवार्य कर्तव्य आहे.

  २ ) विविध मार्गांनी येथील धर्माना नष्ट करण्याचे काम इंग्रज करत आहेत. तेंव्हा सर्व हिंदूनी गंगा, तुळस व शाळिग्राम यांची तर सर्व मुस्लिमांनी खुदा व कुराण यांची शपथ घ्यावी की; इंग्रजांना ठार मारणे हे आपले धर्मकर्तव्य आहे.

येथे मुस्लिमानी खुदाची अन कुराणची शपथ पण हिंदूंनी मत्र आपल्या देव आणी धर्मग्रंथांची शपथ न घेता झाडे, नदी अन दगडाची शपथ घ्यायची आहे. अल्लाशिवाय इतर सर्व देव हे सैतानाची रूपे आहेत हा वहाबी विचार यामागे आहे. अल्लासोबत इतर देवताना मान देणे यास शिर्क असे म्हणतात. वहाब्यांच्या लेखी तो महान गुन्हा आहे.

  ३)  रोहिलखंडाच्या नवाबाला पठवलेल्या आदेशात बहादुरशहा लिहितो - खुदाच्या क्रुपेने हिंदुस्थानातून कुफ्र व शिर्क यांचे उच्चाटन झाले असून इस्लामची प्रस्थापना झाली.. आता शरियत विरोधी एकही गोष्ट घडता कामा नये.


नानासाहेब पेशव्यांचे जाहीरनामे : 

  १ ) सर्वश्रेष्ठ व सर्वशक्तीमान खुदाच्या कृपेने व बादशहाच्या शत्रुसंहारक सुदैवाने ... ख्रिश्चन लोकाना पकडून जहन्नुम / नरकलोकी पाठवण्यात आलेले आहे. त्याबद्दल आनंद साजरा केला पहिजे.

  २ )काफिर इंग्रज या देशात व्यापार करण्याच्या मिशाने आले

 ३)  दयामाया न दाखवता  इंग्रज काफिरांची कत्तल करा त्यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल.
हि शिकवण नानासाहेबाच्या धर्माची नाही हे उघड आहे. आणी त्याच्या नावाने कोण जाहिरनामे काढत होता हे पुस्तकात उलगडले आहे.



ऊठाव काळातील हिंदू मुस्लिम एकता आणि  संघर्ष

बहादुरशहाचा पुत्र व गादीचा सांभाव्य वारस जवानबख्त याने - एका वेळेस एक शत्रू - हे धोरण स्पष्टपणे व्यक्त केले होते. " काही दिवसांतच आम्ही काफिर इंग्रजांना पायाखाली तुडवू व त्यानंतर हिंदूंना ठार करू." (१८५७ चा जिहाद :  पान १६७ तळटीप )

ब्रिटीशांना हाकलून देण्यासाठी हिंदूंच्या सहकार्याची आवश्यकता होती;  पण वहाबींची मूळ प्रेरणा इस्लामी मूलतत्ववादाची असल्याने एकतेचे गारूड फार काळ टिकले नाही.उठावकाळातील हिंदू मुस्लिम संघर्ष मोरेनी २० पानात लिहिला आहे. तरीही काही काळ एकता झाली होती आणि त्या कालानुरूप  एकतेमागेही  इस्लामचीच प्रेरणा होती हे समजून घेणे आवश्यक आहे .


ज्याप्रमाणे अकबराचा सेक्युलर राष्ट्रवाद हा भारतीय इस्लामी संस्क्रुतिचा एक भाग आहे त्याचप्रमाणे १८५७ च्या जीहादाची वहाबी  प्रेरणा आजही मुस्लिम मनात जिवंत आहे .  देव , देश आणि धर्म म्हणजेच स्वराज्य , स्वधर्म आणि अल्लाह यासाठी सर्वत्याग करणारी हि धार्मिक स्वातंत्र्य  प्रेरणा आहे. ती समजून घेणे आवश्यक आहे .  पुढे ब्रिटिश राजवटीच्या काळात डावी चळवळ आणि कम्युनिझम याचा फार मोठा प्रभाव हिंदि तरुणांवर होता . अशाच डाव्या चळवळीतून पुढे येउन देशासाठी फासावर चढलेला वीर म्हणजे शहीद अश्फाक उल्ला खान . त्याविषयी पुढच्या लेखात पाहू .

 - डॉ. अभिराम दीक्षित

१ जाने, २०१४

मैन ऑफ द इयर - केजरीवाल !

मैन ऑफ द इयर - केजरीवाल !

हे वर्ष गाजवले  ते अरविंद केजरीवाल ने ! भारतीय राजकारणाचे डायनामिक्स बदलू शकते हे पट्ठ्याने सिद्ध केले . जात , धर्म , पैसे , दबाव , ताकद या सर्वाच्या पेकाटात लाथ घालूनही भारतीय मतदार मत टाकू शकतो  हे त्याने सिद्ध केले . मुस्लिमांना भगवा बागुलबुवा दाखवून मते मागणारे कोन्ग्रेसी आणि  साधन शुचितेच्या गप्पा मारणारा भाजप या दोघांनीही आता आत्म परिक्षण करावे . नाही तर -  या नाही तर - पुढच्या लोकसभेत दुसरा एखादा झाडू पुन्हा चालेल. आज आप चा चेहरा शहरी आणि उत्तर भारतीय आहे . चार पाच वर्षात असे अनेक आप तयार होतील .आणि इझम ने आंधळे बनलेले वाहून जातील .  कडवे हिंदु , कट्टर दलित आणि सनातनी मुस्लिम आजही फेसबुकावर आपचा निषेध करण्यात धन्यता   मानताना दिसतात .

आप च्या अट्ठाविस जागंपैकि नउ जागा या राखीव मतदार संघातुन आलेल्या आहेत. म्हणजे १/३ जागा ! दिल्लीत १२ जागा राखीव आहेत . कोन्ग्रेस ने २००८ च्या निवडणुकीत या बारा पैकी ९ जागा जिंकल्या होत्या. या राखीव जागात वाल्मिकी या दलित समाजाचे बर्यापैकी प्राबल्य  आहे.  या निवडणुकीत या बारापैकी  कोन्ग्रेस ला " शुन्य "  जागा मिळाल्या .  ९ राखीव जागांवर आप विजयी झाली आणि ३ जागांवर भाजप . मोदींचे इतर मागासवर्गीय असणे भाजप ला लाभदायक  ठरले असणार . याहून मोठा फटका बसला तो बसप या मायावती पक्षाला . गेल्या निवडणुकीत या पक्षाने दलित प्राबल्य असलेल्या २० मतदार संघात २०% मते मिळवली होती . यावेळी पाच टक्के मते मिळाली आणि शून्य जागा मिळाल्या  . दलित मतदार नेहमीच जातीच्या नावाने मत टाकेल आणि  …. आप हा शहरी उच्च मध्यम वर्गियांचा पक्ष आहे……  या दोन्ही प्रकारच्या अंधश्रद्धेतून लवकर बाहेर पडले पाहिजे . ज्या पक्षाचे १/३ आमदार राखीव जागातले आहेत त्यांना उच्च जातीय वगैरे म्हणणे हा शुद्ध वेडेपणा आहे . आणि असे पक्ष लोकशाहीच्या राजकारणात राखीव जागाविरोधी वगैरे ठरू  शकतात -- असे मानणार्यांना लोकशाही निवडणूक प्रक्रियेचे मुलभूत ज्ञानही नाही असे खेदाने म्हणावे लागेल .

मुस्लिम मतदान आजपर्यंत एकट्ठा आणि धार्मिक मुद्द्यांभोवती फिरत राहिलेले आपण पाहिलेले आहे. कोन्ग्रेसाने  मुस्लिमांची मते मागताना कायम धर्माची जपमाळ ओढुन राजकारणात धर्म आणला. शहाबानो केस मध्ये मुस्लिम सनातन्यांसमोर शेपुट हलवणार्या राजीवच्या कोन्ग्रेस ने त्यांचा भंगार प्स्युडो सेक्युलारीझम  पाळण्यासाठी बाबरीचे कुलूप उघडुन आम्ही हिंदु कट्टर वाद्यांसमोरहि कसे नतमस्तक आहोत हे दाखवून दिले. अंधश्रद्धा विरोधी कायदा होण्यासाठीही महाराष्ट्रात एक नरबळी जावा लागला. कोन्ग्रेस चा भित्रा सेक्युलारीझम यावेळी बर्याच  मुस्लिम मतदारांनी नाकारला आणि आप ला भरभरून मते दिली. पुरानि  दिल्लीतल्या  मुस्लिम बहुसंख्य भागात आप ला भरपूर मते मिळाली आहेत.  केजरीवाल मुस्लिमांच्या धार्मिक नेत्यांना जरूर भेटले पण या निवडणुकीत त्यांनी एकही धर्मिक मुद्दा घेतला नव्हता.  मुस्लिम आरक्षण , हिंदुत्व वाद्यांची भीती , मोदिंवर विशिष्ट टिका - यापैकी काहीही अरविंद केजरीवाल याने केले नाही. मुस्लिम मतदारांना भय किंवा धार्मिक लांगुलचालन या दोनच प्रकारे मतदान करता येते या अंधश्रद्धेचेहि निर्मुलन केलेले बरे. अरविंद केजरीवाल आणि कंपनिने तिरंगा हातात घेऊन भारत माता कि जय ! आणि वंदे मातरम ! अशा घोषणा देत प्रचार केला आणि त्यांच्या या सेक्युलर वंदे मातरम ला मुस्लिमांनी साथ दिली हे समजून घेतले पाहिजे . विशेषत: हिंदुत्व वाद्यांनी !

बहु संख्य / जन  हिंदु  समाज सहसा जात धर्म न पाहता मत देतो. भारतात याच कारणाने सेक्युलारीझाम टिकला आहे. निवडणुका सेक्युलर मुद्द्यांवर लढवल्या गेल्या पाहिजेत. वीज, पाणि , रोजगार , अन्न , शिक्षण असे सेक्युलर मुद्दे निवडणुकी दरम्यान चर्चिले गेले पाहिजेत. या मुद्द्यांवर निवडणुका जिंकता येतात. पैसे ,  दारू न वाटता आणि हिंदु धर्म कि जय न करताही निवडणुका जिंकता येतात . अरविंद केजरीवाल ने कोणत्याही मंदिराचे नाव न घेता - प्रशासन , देशभक्ती ,  भ्रष्टाचार अश्या सेक्युलर मुद्द्यांवर निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या.  मेणबत्ती वाले म्हणुन   सुशिक्षित वर्गाला माजोरडेपणे हिणवले जाते . हा माजोरडेपणा भयानक राजकीय चूक म्हणुन सिद्ध झाला आहे .


कोन्ग्रेस चे   तुश्टिकरणाचे धार्मिक , जातीय  नाटक किंवा भाजपाचा कडवा उजवा  राष्ट्रवाद या दिल्लीच्या  निवडणुकीत तरी प्रभावी ठरला नाही . जरी केजरीवाल ने भाजप पेक्षा कमी जागा मिळवल्या…।  तरी हे यश २ वर्षातले आहे . आणि निवडणुकीत केवळ २० कोट रुपयात मिळाले आहे . बाकी दोन्ही पक्षांचा अधिकृत खर्चच हजारो कोटीत आहे. अनधिकृत खर्च न विचारलेला बरा !

आप चा भर सोशल मिडियातल्या प्रचारावर होता आणि कोन्ग्रेसाला त्याचे महत्व समजले नाही . हे खरे आहे . पण केवळ सोशल मिडियावर निवडणुक जिंकता येत नाही . मुंबईत शिवसेना का आणि कशी पसरली ? वीज , पाणि , रेशन कार्ड असे जिव्हाळ्याचे मुद्दे त्या काळचे शाखाप्रमुख जातीने लक्ष घालून सोडवत असत . कोणती हि अडचण आली तर चाळीतला मुंबैकर सेनेच्या  शाखाप्रमुखाकडे तक्रार घेऊन जात असे . आणि त्या काळी शाखाप्रमुखाही इरेला पेटुन छोट्या छोट्या अडचणी सोडवत असत . आप चे  कार्यकर्ते गेली दोन वर्षे अशी स्थानिक    छोटी कामे प्रामाणिक पणाच्या इरेला पेटुन करत आहेत .


पैशाच्या मोहजालात अडकलेले कोन्ग्रेस , राष्ट्रवादी सारखे सरंजामदारांचे पक्ष हे समजू शकत नाहीत . पण बाकीच्यांना केजरीवाल राज्याची निवडणूक महापालिकेच्या मुद्द्यांवर जिंकला एव्हढे समजले तरी पुरे !

कदाचित आप दिल्लीबाहेर वाढणार नाही . पण भारताचे राजकारण , समाजकारण , प्रचार कारण बदलते आहे . एव्हढे समजले तरी पुरे !

बाकी केजरीवाल अमेरिकेचे हस्तक आहेत , मुस्लिमांचे हस्तक आहेत , राखीव जागा विरोधी आहेत वगैरे प्रचार चालू आहे … त्या सर्वांना  येत्या दहा वर्षात  झाडून काढले जाणार आहे . भारत बदलतो आहे . इतिहास कुस पालटतो आहे . हे चलन वळण न समजणारे इझम   पंडित  बाराच्या भावात जाणार आहेत . निदान गेले तरी पाहिजेत !

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *