२९ एप्रि, २०१३

महावीराची वर्धमान अहिंसा



************************************************************************************************************ 
  महावीराची वर्धमान अहिंसा 
************************************************************************************************************ 
 संदर्भ : १) आकलन (नरहर कुरुंदकर ). २)  भारतीय तत्वज्ञान (श्रीनिवास   दीक्षित )


जैन आणि बौद्ध हे   वैदिक   नसलेले   भारतीय धर्म आहेत . त्यांची परंपरा म्हणजे श्रमण परंपरा . या परंपरेत अहिंसेचे स्थान फार मोठे आहे.  हि अहिंसा पुढे सर्वच भारतीयांनी निदान  तत्व म्हणुन तरी मान्य केली आहे . भारताच्या नसानसात भिनलेला सर्वधर्म   समभाव हि सुद्धा याच परंपरेची देणगी आहे .ज्ञानेश्वरांनिहि  अहिंसेचे महत्व उत्साहाने सांगितले आहे.  अहिंसा आणि सर्वधर्म समभाव  यामुळे देशाचा बट्ट्याबोळ झाला आणि देश  गुलाम झाला असे बर्याच देशभक्तांना वाटते.  ते खरे नाही . बौद्ध धर्मीय चीन युद्धखोरीत  मागे नाही . . आणि जैन राजांनीही लढाया मारलेल्या आहेत. मुळात अहिंसा आणि सर्वधर्म समभाव हा षंढपणा  नाही . सध्या शहाण्यासारखे बोलणे म्हणजे षंढपणा  आणि मवालीगिरी म्हणजे मर्दपण असे काहीसे वातावरण महाराष्ट्रात तरी तयार होते आहे.  या वेळी श्रमण परंपरेतलि अहिंसा नेमकी काय आहे ? ते जाणुन घेणे आवश्यक वाटते. 

हि श्रमण परंपरा फार  प्राचीन आहे .जैन हाही एक प्राचीन धर्म आहे . वर्धमान  महावीर हे जैनांचे शेवटचे आणि चोविसावे तिर्थंकर आहेत . या शेवटच्या तिर्थंकराचा  जन्म  येशु ख्रिस्ताच्या जन्माहून  सहाशे वर्ष जुना आहे. इतकी हि परंपरा जुनी आहे .  जैनांची मुळ भूमिका अनेकांतवादाचि आहे .नावात वाद असले तरी  हा काही इझम नाही . जगाकडे पहाण्याचा तो एक प्राचीन भारतीय दृष्टीकोन आहे. 

अनेकांतवाद आणि अहिंसा हि जुळी भावंडे आहेत . अहिंसा म्हणजे केवळ दुसर्याला मारू नका एव्हढी शारीर नाही . अहिंसा पहिल्यांदा मनात जन्म घेते . दुसर्याच्या मताचा आदर करण्यापासून अहिंसा सुरु होते. परमत  सहिष्णुता , परधर्म सहिष्णुता , सर्वधर्म समभाव हि सारी या अहिंसेची पिल्ले आहेत . 


 अनेकांतवाद


आता अनेकांतवाद म्हणजे काय ते पाहू . अंत म्हणजे शेवट . एकान्त म्हणजे एकच शेवट . अनेकांतवाद म्हणजे अनेक शेवट . म्हणजेच कुठल्याही गोष्टीबाबत एकाच  बाजूचे मत न बनविणे .    यासाठी हत्ती आणि सात आंधळ्यांची कथा उधाहरण म्हणुन फिट्ट बसते. सात आंधळे हत्तीजवळ जातात. त्यांनी हत्ती आधी  कधीच पाहिलेला नाही .  हत्तीच्या  शेपटीला हात लावून एका आंधळा म्हणतो हत्ती दोरिसारखा आहे . हत्तीच्या  पायाला हात लावणारा ओरडतो - हत्ती झाडासारखा आहे . हस्तिदंताला स्पर्श करणारा आंधळा पुटपुटतो -  हत्ती भाल्यासारखा टोकदार आहे. सगळ्या आंधळ्यांचे मत वेगवेगळे बनते . 







प्रत्यक्षात हत्ती हा दोरी , खांब , भाला इत्यादी सर्वासारखा असतो आणि कुणासारखाच तंतोतंत नसतो . सत्याकडे पाहण्याचे अनेक मार्ग असतात. एकाचवेळी ते सर्व योग्य आणि अयोग्यही असतात . एकाचवेळी निश्चित आणि  अनिश्चितहि असतात.सत्याचे मानवी आकलन विभिन्न असते. सत्याचे मानवी आकलन अपुर्ण असते.   त्यामुळे स्वत:च्या मताबद्दल कट्टरता किंवा दुसर्याच्या मताचा द्वेष चुक  आहे.    अनेकांतवाद कट्टर पणाचा  मुडदा अहिंसक मार्गांनी  पाडतो !    अहिंसेचा जन्म असा मनात आहे .  प्रथम तो माझ्या मनात होणार आहे त्यानंतर तुझ्या मनात होणार आहे . तो ज्ञानातून होणार आहे.  हे स्पष्ट दिसणारे  वैद्न्यानिक सत्य स्वीकारायला पुरुषार्थ लागतो . शौर्य लागते . स्वत:च्या डोळ्यावरची झापडे काढणे हे येरागबाळ्याचे काम नाही . ते महाविराचे काम आहे. वर्धमान महावीर या शेवटच्या तिर्थंकराचे नाव त्याला अशाप्रकारे  शोभून दिसते. 

अनेकांतवाद हा एक  दृष्टिकोन  किंवा एटीट्युड आहे . नयवाद आणि स्याद वाद हि या एटीट्युड ची पिल्ले आहेत. ज्ञान , सत्य  , रिआलिटि ची व्याख्या नयवाद करतो . कोणत्याही गोष्टीला सुरवात आणि शेवट हा असतोच . जे उत्पत्ती , विनाश आणि नित्यत्व यांनी युक्त असते तेच सत्य . बौद्ध दर्शनाताला अनित्यावाद असाच आहे .  स्यादवाद मोठा रंजक आहे . स्यात म्हणजे कदाचित,   M a y   b e .प्राचीन  सापेक्षतावाद .      

"  देव आहे "      . हे विधान सप्तभंगिनय - सात आंधळ्यां प्रमाणे -सात प्रकारे सत्य असेल  : - 

 १) देव आहे .

 २)   देव नाही    . (आधीच्या नय  वादानुसार जे उत्पत्ती , विनाश किंवा नित्यत्व यांनी युक्त असते तेच सत्य. म्हणून प्रत्येक वाक्य   -विधान हे कधीतरी नष्ट होणार आहे. देव आहे हे विधान सुद्धा नष्ट होणारच बुवा  ! देव आहे हे विधान एकदा  नष्ट झाले कि  - देव नाही हे आपोआप सत्य ठरते !)

३) देव आहे हि  आणि देव नाही हि  . (पहिली दोन विधाने सत्य मानल्याने तिसरे १  + २  = ३  आपोआप सत्य ठरते ! ) . 

४) देव भाषेतून व्यक्त करता येणार नाही . (तिसर्या विधानात परस्पर विरोध आहे तरी ते सत्य आहे.  परस्परविरोध सत्य मानला तर आपोआप हे चौथे विधानही सत्य ठरते )

हि चार लोजिकल विधाने मान्य केली कि चौथ्या वाक्याला पहिली ३ जोडुन पुढची ३ विधाने मिळतात .

५) देव आहे पण तो भाषेतून व्यक्त करता येणार नाही .
६ ) देव नाही  पण हे भाषेतून व्यक्त करता येणार नाही .
७) देव आहे हि  आणि देव नाही हि . पण हे भाषेतून व्यक्त करता येणार नाही .

स्याद वाद मानवी भाषेच्या,  बुद्धीच्या आणि आकलनाच्या मर्यादा स्पष्ट करून टाकतो . पण हि केवळ शाब्दिक कसरत नाही . हे आधुनिक गणितातल्या प्रोबेबलिटि चा सिद्धांत वापरून हि पडताळता येते . मानवी बुद्धी भाषा आणि अभिव्यक्ती याना काही मर्यादा असू शकतात. सत्य अनेक चष्म्यातून पाहता येते .  त्यामुळे दुसर्याच्या मताचा आदर केला पाहिजे. यातूनच अहिंसा आणि परमत  सहिष्णुता , सर्व धर्म  समभाव वगैरे पिल्ले जन्माला येतात . 

 विरुद्ध बाजू तोडुन मोडुन झोडून  नष्ट करणे . प्रतिक्रिया म्हणुन हल्ला करणे . पुढे हल्ला होईल या भीतीने आधीच हल्ला करणे !   वगैरे आदिम रानटी पण मानवी प्रवृत्ती आहेत . अनेकांतवाद या रानटी वृत्तीचा खात्मा करतो . 

मणिभद्रासारखा जैन तत्वज्ञ म्हणतो कि शब्द तर्कशुद्ध आहेत कि नाही हे महत्वाचे . ते महाविराचे आहेत किंवा आणखी कोणाचे    - हे महत्वाचे नाही . जैनांची अहिंसा हि अशी मनात जन्मते . आणि ती दुसर्या आधी स्वत:ची चिकित्सा करते . 





मर्यादा 


जैन धर्माचे मोठेपण सांगत असतान त्याच्या मर्यादा नाकारायचे काहीच कारण नाही . बहुदा तोच खरा अनेकांतवाद ठरेल !  तोंडाला फडकी बांधुन रस्त्याच्या कडेने भीत भीत जाणारे मुनी हा जैन धर्माचा बाह्य आचार आहे . मुळचे तत्वज्ञान नाही . तोंडावरचे फडके हे पराकोटीच्या अहिंसेचे अपत्य आहे . तोंडावाटे सुक्ष्म जंतु आत जाउन मरू नयेत म्हणून हा प्रपंच ! पायाखाली सुक्ष्म किटक मरू नयेत म्हणून रस्त्याच्या कडेनेच जायचे . सकाळीच प्रवास करायचा . सुर्यास्तानंतर जेवायचे नाहि. कंदमुळे (कांदा , लसुण वगैरे ) जमिनीखालून उपटताना आळ्या मरतील म्हणुन झालेला …. लसुण विरहित जैन फ़ास्ट फ़ुडचा जन्म ……. किंवा मांसाहारि कुटुंबाला घर न विकणे … हे सारे स्वत:च्या  जैन पुर्वजांचे अनुकरण आहे. जैन तत्त्वज्ञानाचे आचरण नाही . 

खरे पाहता बांधलेल्या फ़डक्यातुनहि अनेक सुक्ष्म जंतु पोटात शिरतच  असतात.  मानवी त्वचेतून आत   येत   असतात..  अन्नातून  प्रवेशत असतात . मानवी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती  - इम्युनिटि . हर एक मिनिटात हजारो जीवाणू आणि विषाणुंचा मुडदा पाडत असते ! 

आधुनिक काळ हा  विज्ञानाच्या प्रतिष्ठेचा काळ आहे. सर्व जग अणु रेणुंचे बनले आहे असे विज्ञानाने  म्हटले कि - कुणीतरी सोम्या गोम्या किंचाळतो  - आता कणाद ऋषी विज्ञानाला कळाले ! त्यावेळी कणाद कशाला अणु मानतो ? त्याची द्रव्याची व्याख्या काय आहे ? या चिंतेत कुणीही पडत नाही . मग काहिंना वेदात विमाने दिसतात. दशावतारात डार्विन दिसतो. त्यावेळी डार्विनच्या आधी हे का दिसले नाही असे कोणि विचारायचे नसते. डार्विनच्या थेअरितले सुक्ष्म प्रश्नही विचारायचे नसतात  . कुणाला कुराणात मेडिकल सायन्स दिसते. किंवा बायबलातले  इलेक्ट्रोनिक्स शोधले जाते. हि विज्ञान निष्ठा नाही . हा परंपरावाद आहे.  अंधभक्ति आहे.  सगळ्याच धर्माचे लोक अशा छद्म विज्ञान निष्ठेचे पाइक आहेत . जैन धर्म कसा अपवाद राहील ? 

अशी छद्म   विज्ञान निष्ठा जैन मंडळिहि दाखवतात . जैन धर्म समता मानतो. तो वर्णाश्रम विरोधी आहे वगैरे उच्च रवात सांगितले जाते. श्वेतांबर धर्म संप्रदायात वर्धमान महाविराचा जन्म संक्रमणातुन झालेला आहे असे मानले जाते . प्रथम देवानंदेच्या (ब्राह्मण स्त्री ) पोटात राहिलेला हा गर्भ त्रीशिला (क्षत्रिय स्त्री) च्या उदरात संक्रमित झालेला आहे . असे श्वेतांबर परंपरा मनते. महान धर्मपुरुषात ब्राह्मणाचा अंश असलाच पाहिजे अशी हि विचित्र श्रद्धा आहे. या श्रद्धेतून  संक्रमणाच्या चमत्काराचा जन्म झालेला आहे.  यात ब्राह्मण श्रेष्ठ्त्वाचा वास आहे. हल्लीच्या फ़ेशन नुसार हि भटांनी नंतर केलेलि घुसडंबाजि आहे असे म्हणता येईल . पण त्याने आख्खी श्वेतांबर परंपरा ब्राह्मणी ठरण्याचा धोका उत्पन्न होतो .  दिगंबर हि दुसरी परंपरा -  तिर्थंकर फक्त शुद्ध क्षत्रियच असतात असे मानते . इथेही वर्ण श्रेष्ठत्वाचा दर्प उरतोच .  वर्णव्यवस्था अभंगच राहते. 

जैन धर्मात सात तत्वे आणि नऊ  पादार्थ मानले आहेत. त्यातल्या द्र्व्यास्रवात वेदनीय , मोहनीय   अशी  आठ प्रकारची कर्मे येतात . त्यातले एक गोत्र कर्म आहे .गोत्र म्हण्जे आजच्या परिभाषेत पोटजात .  या गोत्र कर्माने सामाजिक दर्जा ठरतो याबद्दल पुरातन जैन साहित्यात कुठेही संदेह नाही . 

जैनांनी सजिवांचे वर्गीकरण केले आहे त्यात त्रस जीव म्हणुन एक भाग येतो . ज्ञानेंद्रियांच्या संख्येवरून सजीव सृष्टीचे केलेले वर्गीकरण यात येते . काळाच विचार करता ते महान आहे. पण आधुनिक विज्ञानाने कालबाह्य ठरवले आहे . जैनांची स्वत:ची पुराणे आहेत . त्यात पुरेशा भाकडकथा आहेत. जैन कुमारी साध्विंचा केस उपटायचा हिंसक विधीही आहे  .  वर्धमानाच्या चिंतनात जैन धर्म निरीश्वरवादी असला तरी पुढे तिर्थंकरांचि देवळे येतात. नवस हि बोलले जातात .  आणि आजच्या आचारधर्मात जैन हा हिंदुधर्मासारखाच एक रुढिवादि धर्म बनून उरतो . 



जैनांचे  तात्विक श्रेष्ठत्व आणि बौद्धिक झेप 


हे सामजिक सत्य स्वीकारूनही तत्वज्ञ म्हणुन जैन मुनींचे आणि  तिर्थंकराचे महान स्थान कुणीही नाकारू शकत नाही. स्याद वाद आणि त्यातून निर्माण होणारी बौद्धिक अहिंसा हि जैन धर्माची मानवतेला देणगी आहे . एकाच वस्तूकडे अनेक दृष्टीकोनातून पाहता येते . त्यामुळे कोणतेच विधान अंतिमत: सत्य नसते. सत्य  - -स्थळ,  काल आणि परिप्रेक्ष सापेक्ष असते (सापेक्षतावाद). अवकाश (अलोकाकाश ) हि संकल्पना  जैन  धर्मात आहे . जैनांनी काल द्रव्य अशी एक कल्पना केलेली आहे.  हे एकमितीय आहे . त्यामुळेच पदार्थात बदल अथवा विकार घडून येतात . त्यामुळेच पदार्थाला स्वत:ची ओळख मिळते.  इथे मात्र जैन धर्म आधुनिक विज्ञानाच्या, भौतिक शास्त्राच्या, सापेक्षतावाद  आणि गणिताच्या खूप जवळ जाउन बसतो. प्राचीन  भारतीय श्रमण परंपरेतल्या ह्या अलौकीक बौद्धिक  झेपेचा मला अभिमान वाटतो.

जैनांची ज्ञान मिमांसा अफलातून आहे. सर्वसाधारणपणे डोळे,  कान इत्यादी   ५ ज्ञान  इंद्रियांच्या सहाय्याने होणारे ते प्रत्यक्ष ज्ञान असे इतर भारतीय दर्शनात मानले जाते. जैन म्हणतात इंद्रियांचे सहाय्य लागत असेल तर इंद्रिये हि माध्यम ठरतात . ज्यास माध्यम लागते ते ज्ञान साक्षात कसे ? मानवी इंद्रियांना खिडक्यांची उपमा देता येईल . खिडकीतून बाहेरचे दिसते . त्याच प्रमाणे बाहेरच्या पदार्थांचे ज्ञान इंद्रिये आत्म्या  पर्यंत 
पोचवतात ! पण खिडकी म्हटली कि भिंती आल्याच . या भिंती पाडून टाकल्या कि खरे केवल ज्ञान प्राप्त होते.   अहिंसक आत्मा असा विश्वरूप होऊन जातो ! 

अनेकांतवाद मनापासून स्वीकारला कि इतरांचे तत्वज्ञान जसे मर्यादित अर्थाने सत्य होते त्याचप्रमाणे स्वत:च्या तत्वज्ञाना वरही मर्यादेची बंधने येतात . हि जगाची सत्यता मान्य करून , कोणताही ग्रंथ , शब्द अगर देव प्रमाण न मानता नैतिक जीवनाची उभारणी करता येते हा जैनांचा  आग्रह होता .  हा आग्रह हा मला जैन धर्माशी जोडणारा सांधा आहे . 






जैनांचा बुद्धिवादी निरीश्वर वाद :


विरोधी पक्षाला ठार मारणार्या हिंसक समाजाला वाद विवाद आणि चर्चेची गरज वाटत नाही . हिंसक माणसालाही बुद्धिवादाची गरज नसतेच . बुद्धिवाद खर्या अहिंसकाला प्रिय असतो . जैन धर्म ईश्वर मानत नाही . पराकोटीच्या बुद्धीवादातून हा निरीश्वरवाद जन्माला आलेला आहे . जैन साहित्य ईश्वराची चर्चा करताना म्हणते :-

१) जगात एकसारखे बदल घडून येतात यावरून तुम्ही यामागे काहीतरी हेतू असला पाहिजे असा अंदाज करता . मग हे हेतू ईश्वरी असले पाहिजेत असा सुपर अंदाज करता ! 

२ ) अंदाज आणि सुपर अंदाज दोन्ही चुकलेले आहे ! जगात बदल होतात . जग कार्य आहे एव्हढेच सत्य आहे. त्यावरून यामागे कोणीतरी - " तो " :- कर्ता - धरता आहे हे सिद्ध होत नाही . समजा क्षणभर "" तो ""  आहे असे वाद विवादासाठि मान्य केले तरीहि ; त्याने नुसते असून उपयोगी नाही . त्याने स्वत:ची इच्छाशक्ती वापरली पाहिजे. इच्छाशक्ती म्हटली तिच्यात चढाव उतार आले . निरनिराळ्या आकांक्षा आल्या . आकांक्षांचे निर्माण होणे आणि नष्ट होणे ओघानेच आले . म ईश्वर लहरी ठरतो . त्यात नित्यत्व कोठे आहे ?

३) बुद्धिमान ईश्वराने जग कशासाठी निर्माण केले हे तरी सांगाल का ? केवळ लहर म्हणुन ? तसे असेल तर विश्वात एव्हढी सुसंबद्धता कशी काय ? जर ईश्वर करुणेने प्रेरित झाला असेल तर जगात त्याने दु:ख का शिल्लक ठेवले ? जर मनुष्याच्या स्वत:च्या कर्माने (कर्मनियम ) दु:ख निर्माण होत असेल तर हे कर्मनियम इश्वरापेक्षा वरचढ ठरतात कि ! म्हणजे ईश्वराला हि हे नियम पाळावेच लागतात . मग तो सर्वशक्तिमान कसा ? स्वतंत्र कसा ? निर्माता कसा ? 

४) हे सारे सोडुन केवळ लीला (instinct / खेळ )  म्हणुन परमेश्वराने जग उत्पन्न केले असे मानले तर परमेश्वर पोरकट ठरतो !  असा पोरखेळ करणारा न मानालेलाच बरा !

५) सृष्टी उत्पन्न करणे हा ईश्वराचा स्वभाव आहे असे मानायचे काय ? मग ईश्वराची भर कशाला पाहिजे ? सर्जन (नव उत्पत्ती ) हा जगाचाच स्वभाव आहे एव्हढे मानले तरी पुरतेच कि !


जैन धर्माची हि निरीश्वरवादी भूमिका आधुनिक नास्तिकाच्या भूमिकेशी मिळती जुळती आहे यात शंका नाही

मानवी बुद्धीचे थिटेपण 

मानवी बुद्धी खुजी आहे हे सर्वच धर्म मानतात . मग जैनाचे काय विशेष ? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. .सत्य समजण्याच्या मानवी  बुद्धीच्या मार्यादेबद्दल कोणत्याही धार्मिक माणसाला शंका असत नाहि. स्वत:च्या शंकाचे निरसन करण्याची जवाबदारी त्याने  देवावर किंवा अल्लाह वर सोपवली असते. हे देव  लोक सहसा असे समाधान करत नाहीत !  त्यामुळे एखाद्या   धर्मगुरूच्या खांद्यावर हा भार आपसुक येउन पडलेला असतो . मुळात धर्माचा जन्मच अज्ञान आणि भीती मधून झालेला आहे.जन्माआधी मी कोण होतो ? म्रुत्युनंतर काय ? जगण्याचा हेतू काय ? को हं ? अशा प्रश्नातून किंवा भविष्याच्या चिंतेतुन -  भीतीतून धर्म नावाची पिल्ले जन्माला येतात. मानवी बुद्धीचे थिटेपण, खुजेपण , मर्यादा -  श्रद्धेला म्हणा किंवा अंधश्रद्धेला म्हणा -  जन्म देत असते.

 हे वैश्विक  बौद्धिक थिटेपण हाच धर्म मानणे -  हे  खरे जैन धर्माचे वेगळेपण आहे.

 सत्याचे मानवी आकलन अपुर्ण असते. इथपर्यंत सर्व धर्मांचे एकमत आहे 
 पण .
सत्याचे मानवी आकलन विभिन्न असते. आणि ती विभिन्नता हेच सत्य - हाच जैन धर्म !   
हा जैनांनी ठोकलेला उत्तुंग बौद्धिक  षटकार आहे .   त्या अंतिम वैश्विक   सत्याचा साक्षात्कार वर्धमान महावीराला झालेला आहे. 



वर्धमान महावीर 


सत्य अनेक चष्म्यातून पाहता येते .  त्यामुळे दुसर्याच्या मताचा आदर केला पाहिजे.  यातूनच अहिंसा आणि परमत  सहिष्णुता , सर्व धर्म  समभाव   जन्माला येतात .  अहिंसेचे वडिल म्हण्जे स्याद वाद आणि स्याद वादाचे पितामह म्हणजे अनेकांतवाद . अशी हि वैचारिक वंशावळ आहे.  . जैन तिर्थंकरांनि भारताला या महान सत्याचा वर दिलेला आहे . हे तत्व समजल्याशिवाय भारत समजणार नाही . गांधिजिंचे आकलन होणार नाही . गांधिंनि हिंदुच्या हृदयावर का राज्य केले ? हेही समजणार नाही .  संख्येने जैन अल्प  आहेत . पण अनेकांतवाद , अहिंसा ,परमत  सहिष्णुता , परधर्म सहिष्णुता , सर्वधर्म समभाव हि तत्वे भारतातिल बहुसंख्य जनतेच्या रक्तातच उतरली आहेत. सामाजिक समता आली नाही पण..... . सर्वच जाती जमाती आणि टोळ्यांच्या हजारो  देवतांना भारतात समान महत्व आले आहे . त्यातून आजचा अगडबंब पण विस्कळीत आणि विषम  असा हिंदु धर्म निर्माण झाला आहे. चार्वाक, सांख्य , जैन, बौद्ध , अद्वैतवादी, वैदिक , द्वैती  यांच्या बौद्धिक चर्चा आणि वाद विवाद आपल्याकडे भरपूर वर्षे चाललेले आहेत .पण  प्राचीन भारतात ; अपवाद वगळता ; धर्मावरून रक्तपात झालेले नाहीत . दुसर्या धर्माविरुद्ध क्रुसेड किंवा जिहाद भारतात नाही . अनेकांतवाद हे त्याचे कारण आहे.   .त्या अर्थाने महावीराने भारत पादाक्रांत केला आहे. वर्धमान चा  एक  अर्थ आहे वाढणारा.  .  शांततेने सहजीवन जगायचे असेल तर सार्या  जगाला या तत्त्वांचा स्वीकार करण्या वाचून पर्याय  नाही .महावीराची वर्धमान अहिंसा जगही पादाक्रांत करेल अशी आशा  बाळगु . अनेकांतवादानुसारच त्यासाठी जैन धर्माचा प्रत्यक्ष स्वीकार करण्याची गरज उरत नाही !    अनेकांतवादाचे वैद्न्यानिक सत्य स्विकारणे पुरेसे आहे.  भगवान महाविरांचे  अहिंसेचे चिंतन  वैश्विक  आणि   वर्धमान आहे.  जर तसे झाले नाही तर.....आपापसात धर्म आणि इझम वरून युद्ध करंणार्या ....  सार्या  जगाला .....कयामत किंवा सत्यानाश किंवा  सर्वनाश अटळ आहे.    


माणुस हा विचारी प्राणि आहे आणि त्यात टिकून राहण्याची क्षमता आहे , यावर विश्वास ठेवला तर कालौघात माणुस अनेकांतवादाचा स्वीकार करणारच !



 ह्या अर्थानेही वर्धमान महावीर हे नाव सार्थ आहे. 







२७ एप्रि, २०१३

मराठी कबुतरांनो वळचणिला पडुन रहा गुमान




१ मे  महाराष्ट्र दिनानिमित्त तमाम मराठि बंधु भगिनी आणि मातांसाठी खास  घरचा आहेर :-


मराठी कबुतरांनो वळचणिला पडुन रहा  गुमान 










मराठी कबुतरांनो वळचणिला पडुन रहा  गुमान 


खरतर लिहायची होती एक रटरटुन  उकळती कविता 
ज्यात असतील गरुड , ज्वालामुखी आणि भवानी तलवार 
छातीचा कोट , दर्यादिली आणि पोलादी मनगटे उचलती भार 
उत्तुंग ध्येयांची हंड्या झुंबरं - सह्याद्री , समुद्र आणि शिवराय 

कारण माय मराठीचे अभिजात शब्दवैभव 
नक्कीच ओघळेल तुमच्या लवलवत्या जिभांतुन 
पेलवेल शुपकर्णांना कोटि शब्दांचा बोजड भडिमार 
आणि आशाळभूत  डोळ्यांनाही दिसेल दिल्लीचे तख्त वारंवार 

पण छाताडात मावायचे नाही कोणतेच स्वप्न महान 
तेंव्हा मराठी कबुतरांनो वळचणिला पडुन रहा  गुमान 

अरे धूत ,   मराठि वाघ आहोत आम्ही वाघ 
ग्यानबाला तुक्यासकट जातीच्या चिखलात बुडवला 
शिवाजीचा राजकीय स्टंट करून टाकला 
 बाकी लोकांबद्दल विचारूच नका - 
 आमच्या  भावना दुखावतात तात्काळ 
हा -  पण गांधी बाबाला आम्हीच ठोकला 

१ ० ५   वेळा थडग्यावर  कोकलू  माझे राष्ट्र महान 
तेंव्हा मराठी कबुतरांनो वळचणिला पडुन रहा  गुमान 

आम्ही देशभरात रोवू शकतो बीज प्रांतियतेचे 
सनातनाचे, जातीयतेचे आणि टग्या झुंडशाहिचे 

पण शिवाजीच्या डोळ्यांनी आम्ही पाहू शकत नाही 
स्वप्न उत्तुंग राष्ट्रियतेचे, परिश्रमाचे , उद्योगाचे 
चौकाचौकात तंबाकू मळत आम्ही संघटना बांधु 
किंवा बिहार्यांना शिव्या देऊ , काचा फोडू , बदडून काढु 


आणि  १ ० ५   वेळा थडग्यावर  कोकलू - दार उघड बये दार उघड गं 
पण तोपर्यंत-  मराठी कबुतरांनो वळचणिला पडुन रहा  गुमान 


 एके दिवशी नियती नावाची बाया खरोखर दार ठोठाविल 
तुमच्या छातीवर लावायला तिने नव निर्मितीचे - नोबेल आणलेत 
तेंव्हा तुमच्या गुलाबी छात्या आजच साफसूफ करून ठेवा 

पण तोपर्यंत-  मराठी कबुतरांनो वळचणिला पडुन रहा  गुमान 


२६ एप्रि, २०१३

मौलाना हसरत मोहानी चे उदात्तीकरण






भारतातले बहुसंख्य मुसलमान हे अब्दुल हमीद आणि अश्फाक उल्ला खान चा आदर्श ठेवतात . त्यांच्या माथी दंगल खोर मौलाना मारण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे . सध्या काही धर्मांध शक्तींनी मौलाना हसरत मोहानी चे उदात्तीकरण चालवले. आहे . कोण आहेत हे मौलाना हसरत मोहानी?


१) मुस्लिम लीग चे १ ९ २ १ अन २ ३ सालचे अध्यक्ष . या अधिवेशनात कॉंग्रेस च्या - नोन व्हायोलंन्स थॉट वर आक्षेप घेतला गेला . याच लीग ने डायरेक्ट ए क्षन डे पुकारून भारताची फाळणी केली .

२) अफगाण आक्रमण या विषयावर दिलेल्या मुलाखतीत हसरत मोहानी म्हणतात - " मी पहिल्यांदा मुसलमान आहे त्यानंतर सर्वकाही आहे. " . १ ९ २ ० च्या अलाहाबाद च्या खिलाफत कमिटीत मौलाना हसरत मोहानी यांनी गर्जना केली - " अफगाणिस्तान ने आक्रमण केल्यास भारतीय मुसलमान त्याला मदत करतिल." …… याच अधिवेशनात हे मौलाना तुर्कस्थान च्या दुर्दशेमुळे ढसा ढसा रडले होते .
(http://books.google.co.in/books/about/Gandhi.html?id=DU50PwAACAAJ) पान २ १ ७


३ )केरळातील मोपला मुस्लिम आणि हिंदु यात झालेल्या दंगलिवर भाष्य करताना मौलाना हसरत मोहानी म्हणतात - " मोपला प्रदेश हा " दार उल अमन" राहिलेला नसून " दार उल हरब " झालेला आहे . मोपलांना असे वाटत होते कि , हिंदु लोक शत्रू बरोबर संगनमत करत होते . त्यामुळे मोपले हिंदुना दोन पर्याय देत होते - कुराण (धर्मांतर ) किंवा तलवार (मृत्यू) . मृत्युपासून सुटका करून घेण्यासाठी जर हिंदुनि इस्लाम स्वीकारला तर ते धर्मांतर स्व खुशीचे ठरते . " Roland Miller "Mappila Muslims of Kerala: a study in Islamic trends" orient longman orient longman (1976 ) pg no 150


४) या मौलानांचे उदात्तीकरण करण्याचा चंग अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटि ने बांधला आहे. जमाते इस्लामी ची साथ आहे . त्यासाठी त्यांचा डॉ . बाबासाहेब आंबेडकरांबरोबरचा संदर्भहिन फ़ोटो वारंवार प्रकाशित केला जात आहे. (संदर्भ :http://aligarhmovement.com/book/export/html/264) दोन राजकीय नेत्यांचा एकत्र फ़ोटो असणे म्हणजे त्यांचे विचार जुळणे असे नाही .


५) डॉ बाबासाहेब आबेडकर त्यांच्या पाकिस्तान ओर पार्टिशन ऑफ इंडिया या ग्रंथात या मौलाना हसरत बद्दल काय म्हणतात ? . बाबासाहेबांनी मौलानाचा कावा उघड केला आहे . त्यांनी योग्य अवतरण उद्धृत केलेले आहे . - (महाराष्ट्र शासन सरकारी प्रकाशन पान १ ६ ० , पीडीएफ पान ७ ८ -http://www.ambedkar.org/pakistan/pakistan.pdf )

बाबासाहेब म्हणतात " - “ But I was surprised, an out-and-out Nationalist like Maulana Hasrat Mohani opposed the resolution on the ground that the Mopla country no longer remained Dar-ul-Aman but became Dar-ul-Harab and they suspected the Hindus of collusion with the British enemies of the Moplas. Therefore, the Moplas were right in presenting the Quran or sword to the Hindus. And if the Hindus became Mussalmans to save themselves from death, it was a voluntary change of faith and not forcible conversion—Well, even the harmless resolution condemning some of the Moplas was not unanimously passed " ( पाकिस्तान ओर पार्टिशन ऑफ इंडिया . महाराष्ट्र शासन सरकारी प्रकाशन पान १ ६ ० , पीडीएफ पान ७ ८ - http://www.ambedkar.org/pakistan/pakistan.pdf । पीडीएफ पान ७ ८ )

बाबासाहेबांनी मौलांनांचा अंतस्थ हेतू उघड करून ते कसे दंगलखोर होते हे सिद्ध केले आहे. अशा मुस्लिम लीग समर्थक दंगलखोराचा फ़ोटो बबसाहेबांबरोबर लावणे योग्य आहे काय ?

भारतातले बहुसंख्य मुसलमान हे अब्दुल हमीद आणि अश्फाक उल्ला खान चा आदर्श ठेवतात . त्यांच्या माथी दंगल खोर मौलाना मारण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे . आणि बाबासाहेबांचे त्याबरोबरचे चित्र हे दिशाभूल करणारे आहे हेही कोणीतरी सांगितले पाहिजे म्हणुन हा उपद्व्याप .
 — 

२ एप्रि, २०१३

बडवा ( कडव्या हिंदूची बखर ) - भाग 3


बडवा



बडवा भाग १ साठि लिंक : -  http://drabhiram.blogspot.in/2013/03/1.html
बडवा भाग 2 साठि लिंक : -  http://drabhiram.blogspot.in/2013/03/2.html

पेग पहिला


शिंदे सरांनी स्कॉचचे दोन लार्ज पेग बनवले. विनोद च्या ग्लासात थंड सोडा भरला. स्वतःच्या ग्लासात बर्फाचे तीन खडे टाकले फक्त.... बर्फ ग्लासात घोळवत घोळवत ग्लास आदळला आणी म्हणाले " चिअर्स... विनोद तुला माहितिय ? ही चीअर्स ची प्रथा कशी सुरू झाली ते ? तसा तू ....या विषयात नवाच ! मी बर्‍याच गोष्टी ऐकल्यात चीअर्स बद्दल. युरोपातली प्रथा आहे म्हणतात. .....युद्धानंतर शत्रूपक्षातले जनरल लोक वाटाघाटी करायला बसायचे.... त्यावेळी बिअर ढोसायचे. कधी कधी बिअर मधूनच एकमेकाना विषप्रयोग करायचे. त्यावर उपाय म्हणून चिअर्स आलं. चिअर्स च्या वेळी ग्लास आदळायचे.... मग दोन्ही ग्लासातली बिअर इकडे तिकडे मिसळते.... बियर मधला अर्क मिसळला कि   विषप्रयोगाचा धोका टळतो. म्हणून ! चिअर्स ! "

विनोदनं पहिल्यांदा एक खणखणीत घोट ओढला. शर्टाच्या बाहीन ओठ पुसले. स्कॉच प्यायची ही पद्धत नव्हे खर तर. पण शेवटी दारू ती दारूच. अर्धा झालेला ग्लास टेबलावर ठेवत विनोद बोलला '' आपण जनरल तर आहोत सर; पण शत्रूपक्षातले नाही. तेंव्हा विषप्रयोगाचा धोका नाहीच ! आणी खरं युद्धही अजून सुरू व्हायचय.. "

" आणी रणांगणावर माझा सेनापती विजयी होणारच. तेंव्हा थ्री चीअर्स फॉर यू विनोद. पहिल्यांदा पत्रकाची केस निल करून  देतो. केस निल झाली की, टार्गेट : उस्मान ची बहीण नाजरीन ... १८ वर्षाला सहा महीने कमी आहे वय तिच. उचलायची तिला. आणी मग हो गायब ६ महीन्यांसाठी. लग्नाच कायदेशीर वय झाल की सहा महीन्यानी बेळगावच्या नटेश्वर मंदिरातच धडाक्यात लग्न लावतो तुमचं. हिंदूची पोरगी पळवल्याचे परिणाम कळू दे साल्याना. त्यानंतर फक्त चार --- सहा महिन्यात लोकसभेची निवडणूक लागेल. चमत्काराला नमस्कार होतोच विनोद. आणी आपला हिंदू समाज मेल्या आईच दूध प्यालेला नाही. पराक्रमाला मतदान होतंच. हजारो भाषणांपेक्षा एक बाबरी काम करते आणी देशाचं सरकार बदलते... राजकारणात जनतेची नाडी कळली पाहीजे. मला बेळगावच्या मतदाराची नाडी माहितीय विनोद. शास्त्रीजींची सुनेत्रा उस्मान न पळवली आणी कट्यार खुपसली बेळगावच्या काळजात. ती जखम सांधणारा खासदार होणारच. आणी तुझी पक्षाकडून उमेदवारी फिक्स करायची जवाबदारी माझी ! निवडुन आणण्यासाठी जी काही ' गडबड '  करावी लागेल त्याचीही जवाबदारी माझी . तेंव्हा भावी खासदार श्री विनोदभाउ बडवे.. चीअर्स.. थ्री चीअर्स फॉर यू !" ग्लास उंचावत शिंदे म्हणाले; आणी मग त्यानी एक हलका सीप मारला.

गडबडलाच विनोद. खर तर त्याला त्याच्या आणी नियतीच्या प्रेम प्रकरणाविषयी सरांशी बोलायच होतं. पण सरांची गाडी वेगळ्याच रूळांवर धावू लागली होती. ही खासदारकीची गाडी विनोद सोडणार न्हवता. पण नियतीची मधुर साथसोबतही सोडू इच्छीत न्हवता. गोंधळलेल्या चेहर्यान सरांकडे बघत त्यानी ग्लास उचलला आणी एका दमात तो संपवत म्हणाला " जरा गोंधळलोय मी सर. आपल मागे बोलण झाल्यानुसार नाझरीनच्या मोठ्या बहिणीशी क्रीष्णान सूत जुळवलंवतं; तिला उचलायला आम्ही टीपू सुल्तान नगर पाशी गेलो आणी मग सगळा राडा झाला..."

ग्लास संपवत शिंदे म्हणाले " प्लॅन चेंज विनोद... क्रीष्णा आणी तू दोघानी सय्य्दांच्या पोरी उचलायच्या. क्रीष्णाच लग्न लगेच लावायच. तू नाबालिक नाझरीन ला घेउन ६ महीने गायब रहायच. म्हणजे सहा महिने विषय मिडियात तापत राहिल. तिच लग्नाच कायदेशीर वय झालं की प्रकटायचं. आणी निवडून यायचं". तू निवडुन येण्यासाठी जो दंगाधोपा आणि खूनखराबा करावा लागेल त्याची जवाबदारी माझी.....
गोंधळलेल्या चेहर्यान विनोदने दोघांचे पेग भरले आणी म्हणाला " धक्का बसला सर."

पेग दुसरा

पुढचे दोन तीन घुटके मारताना शिंदे शांतपणे विनोदकडे पहात होते. म्हणाले " गडबडून जाउ नको विनोद.. मी अतीशय विचारपूर्वक योजना बनवलीय. तू नाझरीनला घेउन गायब व्हायच. पहिल्यांदा पोलीस तुला कुठे शोधतील ? बेळगावात. पण तू त्याना सापडणार नाहीस. कारण तू तेंव्हा पंढरपुरात असशील. तिथल्या गर्दीत मिसळलेला. तुझं वडीलोपार्जीत घर आहे तिथं. त्याबद्द्ल कोणालाही माहीत नाही. त्या घरी रहायचं मागच्या दारानं एन्ट्री घ्यायची आणी सुमडीत रहायचं वरच्या सोप्यावर. कार्यकर्ते शिधा पोचवतील तुला. बाकी पोलीस तुला शोधतील मुंबई पुण्यात पण त्याना काय मिळणार ? केळं.... ! बाकी पोरगी एकदा अठरा वर्षाची झाली की लावू वाजत गाजत लग्न. तेव्हा पहिल मिशन म्हणजे नाझरीनला फूस लावून पटवणे. बाकी ते जमेलच तुला. तुझ्यासारख्या देखण्या राजकुमाराची वाटच पहात असतात पोरी."

" सर तुमच्याशी नियतीबद्दल बोलायचं होतं थोडसं " विनोद चाचरत म्हणाला.

दोन पेग होत आले. शिंदे भावूक झाले. ग्लास संपवत शिंदे म्हणाले मला पण बोलायचय तिच्याविषयी. " बाकी तू आणी नियती मला मुलं दोन. दोघही दिसायला सुंदर सर्वगुणसंपन्न की काय ते ! पण मुकं लेकरू नियती. पोरीच्या बापाच्या चिंता कळायच्या नाहीत तुला विनोद. "

विनोदचं डोकं भणाणलं होतं. आपण कोण कुठले पोरके भटके. आपल्यासारख्या अनाथाला शिंदे सरानी मायेने जवळ घेतलं , नेता बनवल ....  मुलगा मानलं, राजकीय वारसदार मानलं, त्यांच्या मुलीबद्दलच्या भावना कशा सांगाव्या त्याना ? त्यांच्या आपल्याबद्दलच्या योजनांवर पाणी कसं फिरवायच ? कस खेळायचं त्यांच्या आणी  खर तर आपल्याही राजकीय स्वप्नांशी ?  भानावर येत विनोद म्हणाला " नियतीबद्दल बोलत होता सर ... "

ग्लासातले बर्फखडे खुळखुळवत शिंदे म्हणाले. '' हो तिच्यासाठी स्थळ बघितल आज. स्थळ ऐकून धक्का बसेल तुला.. इंन्पेक्टर राजवीर पाटील ! मुलगा मोठा उमदा वाटला मला. पण पक्का .. हिंदुत्वाचा विरोधक. आधी मानवता - माणुसकी  वगैरे बडबडला. कशाला पायजे धर्मावरून भांडणं वगैरे वगैरे... त्यानंतर तेच तेच बामन बामन बामन बामन करत बसला, वेदोक्त प्रकरण बामनी कावा वगैरे.. मी विचारलं त्याला - हिंदुत्व  ? काय आहे हिंदुत्व ? बामणाला आंदण कुणी दिल ? कुणि दिली मक्तेदारी हिंदुत्वाची भटाला  . काय आहे हिंदुत्व ??

ग्लास टेबलावर ठेवला. दोन्ही हात मानेमागे ठेवत ते म्हणाले " मग मी राजवीरला त्याच्याच आजोबांची गोष्ट सांगीतली. त्याचे आजोबा ...माझ्या चुलत्यांचे मामेभाउच ते ..... पाहुण्यापैकि आमच्या ...नाना पाटलांबरोबरचे  स्वातंत्र्यवीर होते. ते कम्यूनिस्ट. पण निजामी राज्यातल्या रझाकरांची मस्ती उतरवायला. नानांची तूफान सेना धावली होती....तेव्हा राजविरचा आजा हातात ठासणीची बंदुक घेऊन धावला होता ....... ते हिंदुत्व "

"माझा देश... देशावरच प्रेम... देशद्रोह्यांची चीड म्हणजे हिंदुत्व... माणुसकी हाच खरा धर्म बरोबराय.. घराला कुलुप घालू नये ही पण एक आदर्श गोष्ट आहे... पण जोपर्यंत या जगात खुनी आहेत बलात्कारी आहेत; तोपर्यंत घराला कुलुपांची आवश्यकता आहे... माणुसकी हाच खरा धर्म असला तरीही जोपर्यंत इस्लामी जिहादची दारू पिउन या लांड्या  डुकरांचा दहशतवादी नंगानाच या देशात सुरू आहे तोपर्यंत आम्ही हिंदुत्वाचे रणशिंग फुंकतच राहणार. ....शेंडीच्या गाठीत, जानव्याच्या दोरीत, गायीच्या मुतीत हिंदुत्व नाही...... पुराणातल्या वांग्यात, तीर्थाच्या भांड्यात, उपासाच्या सांडग्यात हिंदुत्व नाही..... वेदांच्या उक्तीत ..., यज्ञाच्या आगीत , ब्राह्मणांच्या पंगतीत हिंदुत्व नाही... देशद्रोह्यांची दाढी उपटायला मर्द हिंदूंची मूठ वळते -  त्यात -आणि त्यातच हिंदुत्व आहे..त्या वळत्या मुठीत ... पेटत्या डोळ्यात ...... सीमेवरच्या जवानांत , जवानांच्या हौतात्म्यात , त्यांच्या चीतेतल्या निखार्‍यात हिंदुत्व आहे. कारसेवकांच्या अंगारात हिंदुत्व आहे. वीरपत्नींच्या त्यागात - अश्रूत हिंदुत्व आहे..... त्यांच्या डोळ्यातले एक थेंब पाणी लाख  लाख तरुणांचे रक्त उकळवते त्यात हिंदुत्व आहे. त्या उकळत्या रक्तात, रक्ताच्या नात्यात हिंदुत्व आहे. हिंदुचे बंधुत्व म्हणजे हिंदुत्व ! "
"मग काय म्हणाला राजवीर ?" पेग भरत विनोद ने विचारले.

पेग तिसरा 

 राजवीर फार नेमकं बोलतो. हिंदूनी एक व्हायला कुणाचीच अडकाठी नाही, पण हिंदुत्वाचा वटवृक्ष जर वाढायचा असेल तर त्यावरची सनातनी बांडगुळं भवानी तलवारीनी छाटावी लागतील म्हणाला तो. ठीकय. पण त्यावर जास्तीची मल्लीनाथी करत म्हणाला, पण त्यासाठी हिंदू आणी मुस्लीमात अविश्वास तयार करायची काहीच गरज नाही. तसं करू नका तुम्ही लोक". शिंदेनी राजवीरची भाषा ऐकवली.

ग्लास टेबलावर आदळत विनोद म्हणाला "आईच्या गावात गेला विश्वास."

शिंदेनी खांद्यावरची शाल काढून सोफ्याच्या पाठीवर टाकली. स्कॉचचा एक हलका सिप मारला आणी डोळे बारीक करत विनोद कडे पहात, स्मितहास्य करत ते म्हणाले " कसा जाईल आइच्या गावात ? पानिपतात पूर्वीच मेला नाही का तो ? मग मी राजवीरला ९२ च्या दंगलीवेळची एक गोष्ट सांगीतली.

 बेळगावाचा आमदार होतो मी तेंव्हा. भल्या पहाटे एक कार्यकर्ता माझ्याकडे आला म्हणाला बडी मशीदीत मुस्लीमांनी शस्त्र लपवलियात..... मग पहाटेच्या नमाजाच्या वेळेलाच -- दोनशे कार्यकर्ते घेउन धडकलो मशीदीत. सरळ आत घुसलो. मला पाहून सारी मुसलमानं भीतीने चळाचळा कापत उभी होती. ....सगळी मशीद शोधली. तपासली.... एकही शस्त्र न्हवतं... मग दुसरा कार्यकर्ता बोलला इथे नाही सर ...अल निर्मा मशीदीत पेट्रोल बाँम्ब आहेत... मग आम्ही तीही मशीद तपासली. तिथंही काही मिळालं नाही. त्यादिवशी बेळगावातल्या तब्बल पंधरा मशीदी तपासल्या आम्ही.... एकाही मशीदीत काडी सुद्धा   मिळाली नाही . तलवारी आणी पेट्रोल बाँम्ब सोडाच. शाट्ट मिळाल नाही .. पोपट झाला माझा तेंव्हा. पण आजही कुणी मला मशीदीत शस्त्र लपवल्याची टीप दिली तर मी तपासायला जाईनच तिथं. कारण काय ? अविश्वास ! अविश्वास आहे आपल्या देशात मुसलमानांबद्द्ल...... मशीदीत शस्त्र लपवल्याची बातमी कोणालाही खरीच वाटेल. पण प्रश्न असा आहे की का नाही बसत विश्वास अल्पसंख्यांवर? पाकिस्तानातल्या हिंदूनी मंदिरात शस्त्र लपवल्याची टीप तिथल्या मुसलमानाना कुणी दिली तर ? काय प्रतिक्रीया असेल त्यांची ? दाताड विचकटून हसतील ते पाकडे ! आता कळलं का नाही बसत विश्वास .....

त्यांची वागणूक, आचार आणी अनुभवच असे आहेत की विश्वास ठेवूच शकत नाही मी."

" मग मी राजवीरला म्हणालो तुला पोपटाची गोष्ट महितीय का ? एक सुंदर राजकन्या असते. एका राजकुमाराचं तिच्यावर फारफार प्रेम असतं. एकदा एक दुष्ट राक्षस त्या राजकन्येला पळवून नेतो. मग राजकुमार काय करणार ? झक्कत जातो लढायला राक्षसाशी. पहिल्यांदा राक्षसाचा हात छाटतो. लगेच दुसरा हात उगवतो. पाय उडवल्यावर नवीन पाय उगवतो. मुंडकं कापल्यावर नवं मुंडकं उगवतं. आता राजकुमाराला प्रश्न पडतो की याला मारायचा कसा? मग त्याला तिथं एक पोपट दिसतो. पोपट. हिरवागार. लाल चुटुक चोचीचा. राजकुमार त्या पोपटाची मान पिरगाळतो. राक्षस आचके विचके देत जमनीवर धाडकन पडतो. जीभ बाहेर लटकते त्याची. कारण राक्षसाचे प्राण त्या पोपटात असतात........ महाराजांनी त्यांच्या वाघनखानी अफझलखान उभा फाडला. पण संसदेवर हल्ला करणारा भडवा..... अफझलगुरू जन्माला येतोच आहे.  . एक अफझल फाडला तरी दुसरा तयार होतोच.... ह्या अफझुल्ल्यांचे प्राण कशात आहेत ? त्यांच्या पोपटाची मान पिरगाळल्याशिवाय हे अफझल सत्र थांबणार नाही. तो ईस्लामी धार्मीक शिकवणुकीचा पोपट आहे. जिहादचा पोपट छाटला पाहिजे. हिंदू म्हणून ताठ मानेन या देशात जगणे. हा माझा हक्क आहे. और मै कीसी आने वाली पीढीओंके लिये नही लढ रहा. मुझे मेरा हक चाहिये. और वो भी अभी. इसी वक्त. "

विनोदनी एका दमात ग्लास संपवला. त्याच्या आशा पल्लवित, चित्तवृत्ती उल्हासित झाल्या होत्या. अधिरपणे त्याने विचारल. "मग काय ठरलं नियतीच्या लग्नाचं ?"

" काय होणार ? लटकतोय अजून प्रश्न. पण राजकारण वेगळं आणी रक्तसंबंध वेगळे. हे त्यालाही कळतं. आणी मलाही.......पुढच्या बैठकीत गाडी सरकेल पुढे... ठरवून टाकू लग्न. "

विनोदच डोक गरगरू लागलं होतं. डोळे मिटले की की समोर वर्तूळं दिसायची. त्यात नाचती नियती तरळायची. तीन पेगनंतर भीडही थोडी चेपली त्याची. ग्लासच्या तळात बघत तो म्हणाला " .....सर नाझरीनशी लग्न नाय करायच मला. लग्न म्हणजे काय खेळय ? माझा खेळ नका मांडू.... माझ्या पुर्‍या आयुश्याचा प्रश्न आहे हा."

शिंदेनी ग्लास संपवला. नशा चढू लागली होती. नशा दारूची. ..नशा राजकारणाची... नशा सत्ताकारणाची... नशा इतिहासाची...नशा भूतकाळाची... नशा स्वतःचीच. छातीवर हात आपटत ते म्हणाले " हा मी. मी मल्हारराव केशवराव शिंदे. कोण आहे माहित आहे ? गरीब शेतकर्‍याचा पोरगा. आजचा आमदार. ४० कोटींचा मालक. बेळगावातल्या हिंदूंचा त्राता. आणी तुझा भाग्यविधाता. का आहे? कारण स्वतःच्या खाजगी जीवनाच तेरावं घालूनच राजकारणात उतरलो मी. तुझ्या आयुश्याचा प्रश्न नाही हा...... हा हिंदूच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. हा देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे. तान्हाजी, बाजी, मुरारबाजीने स्वतः खाजागी आयुश्य फाट्यावर मारल म्हणून तू बडवा राहिलास. नाहीतर सय्यदांचा भडवा बनून नमाज पढतास."

डाव्या हाताने सोफ्याचा आधार घेत शिंदे पुढे कलले. ग्लास टेबलावर आदळत म्हणाले " भर पेग"

पेग चौथा

शिंदेनी पुन्हा ग्लास उचलला त्यातले बर्फाचे खडे स्कॉच मधे गोल - गोल फिरवले. " हे चक्र तोडलं पाहीजे. आता बस्स झालं. अब हिंदू मार नही खायेगा. तुम्ही पन्नास माराल तर आम्ही पाच हजार मारू. तुम्ही एक पोरगी बाटवाल तर आम्ही शंभर पोरीना शुद्ध करू. दुसरी भाषा समजत नाय भाड्याना. हे युद्ध आहे. त्यासाठी रणचंडी बळी मागते आहे. तुझ्या वैयक्तीक खाजगी जीवनाचा बळी. कवीता आहे ना ती ... जिवा,तान्हाजी, बाजी, मुरारबाजीवरची.... सेतुनिर्माण.... देहाचा पूल


स्वर्णीम पृश्ठ गतकालके
पढतेही कंपित हृदय, प्रस्फूर्त बाहुद्वय |

जो नस नस मे थी दौडी
बि़जली हमारी रगोंमे
हतवीर्य आज वह विद्युत
जीवन हुवा श्वानवत, या फूटी अपनी किस्मत|
किस्मत पे न रोते थे
खुद भविष्य अपना लिखते थे,
हस्तरेखाओंकी दिशा, मुट्ठी से बदलते थे |

मुठीत दारुचा ग्लास उंचावत विनोद उभा राहिला. कविता म्हणू लागला

खान उठाये बिडा ,  बिजापुरी दरबार में 
इस सिवा चूहे को , मै पकडुगा शान से
कसम खाकर जिहाद की निकला जानोशान से 
मुर्तिया भंजने गोवध करने , मुजाहिद निकले शौक से 

जासूद मौजूद सिवा का , बिजापुरी दरबार में 
पहुचा राजगड  किला , करे शिवा को मुजरा 
वृत्त सुनकर सिवा , हो गया उठ खडा 
खडे हो गए भाले , शत्रु रक्त के प्यासे 

जय भवानी नि गर्जना आसमान में लहराई 
हर हर महादेव  कहते    फ़ौज अवनिपर दौड़ी 

देखा तो बड़ी खायी ; अंगारो से भरी हुइ 
अद्भुत संकट आसमानी ; कैसे कुचले सुल्तानी 

आता विनोदच्या उघड्या डोळ्याना वर्तुळं वर्तुळं दिसू लागली होती. तिरमिरत तो बोलू लागला " सर म्ह्टलं तर कविता काल्पनीक आहे. म्हटलं तर जिवा,तान्हाजी, बाजी, मुरारबाजीवरची... रूपक कविता..म्हटलं तर भूतकाळ... " भूतकाळ अनिश्चित असतो" ....... " इतिहास हा अंदाज असतो " ...... मी गडकरी शिवबाचा....खानाची ती हिरवी छावणी. त्या भोवती खणलेला खंदक. खंदकात निखारे. पेटते निखारे. पल्याड जावून माजलेले बोकड चिरायचेत. त्यांच्या रक्तासाठी भाले तहानलेत. पण पेटत्या निखार्‍यावरून आत कस जायच ? विझवायला जवळ ओढे न्हवते. स्वराज्या भोवती अशाच अडचणींचे निखारे होते. पण मावळे लेचेपेचे न्हवते. " एका हाताने सोफ्याचा आधार घेउन विनोद उभा होता. थोर विचारवंताचा - वक्त्याचा आव आणत त्याने उजवा हात उंचावला होता.

ग्लास खाली ठेवत शिंदे उठले. पुढची कविता म्हणू लागले

" कल्पना स्पर्शली चित्ता
जो तोच पटाइत चित्ता
ठाकूनी पुढे सगळ्यांच्या

जाहला शिवजी वदता -
जाणार काय माघारा ?
सरकार काय हे पुसता ?
ऐका तर माझे आता -

जी तयार हुकुमाकरता

खंदकावरी जरी कोण
आपुले देह टाकून
मज देइल पूल करून ? "

"अंगारो की शयन
बनेगी कुसुमसज्जा
वीरो अपने तन से
सेतुनिर्माण है करना"

विनोदनं आपला वर नेलेला हात झोकात खाली आणला. चुटकी वाजवून त्वेषानं तो म्हणाला -

" निघताच शब्द बाहेर
जन निजले त्यावर चार
त्यांचिया शरिरावरूनी
छावणीत सगळे घुसले

गळे शत्रूचे चिरले

रक्त ते भाले प्याले"

इतक्यात उगवला अरुण
तो गुलाल उधळी वरून

अरुणोदय बस तभी हुआ
केसरिया रंग छाया
स्वाधीनता का भगवा
आस्मान मे लहराया "

रणचंडी व्यक्तीस्वातंत्र्याचा बळी घेत होती....नशा चढत होती. दारूची.... युद्धाची. ....अनिश्चित भूतकाळाची. काल्पनीक इतिहासाची.... ताम्रसुरा प्यालेला नभातला दैत्य माजला... राजकारणाचा राक्षस जास्वंद चुरगाळत होता. सत्ताकारणाचा सैतान नसानसात भिनत होता. मोगरा पिचत होता.

धडपडत विनोद टेबलाजवळ आला शिंदेकडे पहात म्हणाला " माजी आमदारसाहेब .... भावी खासदाराचा पेग भरा "

पेग पाचवा



"विनोदपंत जरा चढलिय तुम्हाला." शिंदेच्या या उद्गारांवर विनोद म्हणाला - " मी कुठला पंत ? मी तर जंत सर... भरा पेग. पण सर खासदार होणारच आपण. कितिपण पैसे खर्च करू. माझा एक काँटॅक्ट आहे मुंबईत. लय भारी टॉप सिक्रेट. तुम्हाला सांगेन नंतर त्याविषयी ... "

पाचव्या पेग ला दोघांनी पुन्हा चिअर्स केलं. थरथरत्या हातांनी ....विनोदने पुन्हा एका दमात ग्लास संपवला आणी तळहाताने ओठ पुसले. कडक स्कॉच जठर जाळत धमन्यांत शिरली...... मेंदूत पसरली. भास. शौर्याचे भ्रम. ....नियतीचे विभ्रम. वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं.

 शिंदे सर बर्फाचे खडे स्कॉच मधे गोल गोल घोळवत होते. विनोदच्या अर्धोन्मलित डोळ्या समोर दिसत होती - वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. स्कॉच चा महाप्रचंड ग्लास. कट्यावर बसावं तसं आपण ग्लासच्या कडेवर बसलोय. बर्फाचे मोठमोठे क्युब दोन्ही हातानी उचलून ग्लासात फेकतोय. त्यामुळे स्कॉच मधे ऊठतायत तरंग - तवंग - वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. विनोद नी बर्फाचे धोंडे जोरजोरात ग्लासात फेकायला आरंभ केला. आरंभ है प्रचंड, बोले मस्तकों के झुंड । आज जंग की घडी की तुम पुकार दो ॥ धाडड बर्फाचा मोठाला धोंडा नियतीच्या डोक्यात आदळला. आयला .....तिनं तर आधीच त्या वर्तुळात फेर धरला होता. बर्फाच्या खड्याबरोबर नियतीपण ग्लासात वितळून गेली. तिनं विनोदची साथ सोडली.... तशी नियतीन विनोदाची साथ कधीच सोडून दिली होती ....वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं.


विनोदला गरगरू लागलं. तो उभा राहिला. पाय लटपटत होते. म्हणाला - " मी निघतो सर "

विनोदची पाउलं जिन्याच्या दिशेने पडली. विनोदची धडपडती पावल जिन्यावर वाजत होती. डोक्यात घण वाजत होते. दारूच्या नशेत मुंबईच्या काँटॅक्ट बद्दल बोलण्याची घोडचूक घडली होती. त्याच्या पावलांचा आवाज बंद होइस्तवर शिंदे ग्लासातले खडे घोळवत होते. आवाज बंद झाला. विनोद घराबाहेर पडलाय याची खात्री झाली.

विनोद बाहेर पडत असताना .. नियतीचे मुके डोळे .. त्याकडे हताश विषण्ण पणे......  आणि  साहजिक त्वेषाने बघत होते .. पण त्या डोळ्यात द्वेशापेक्षा करुणाच जास्त दिसली मला ... 


शिंदेनी मोबाईल उचलला. एक नंबर डायल केला. पहिल्याच रिंग ला तिकडच्या व्यक्तीने तो उचलला. - " पोती पोचली ? .... अच्छा, अच्छा. जपून ठेव. फार तर १० दिवस माल पोलिसांपासून लपवून ..... अच्छा, अच्छा. त्यानंतर त्याचा वापर. ..." शिंदेनी प्रसन्न चित्ताने हसत मोबाइल बंद केला. "सोन्या जेवण लाव" शिंदेनी हुकूम सोडला.

*********************************************************************************

दिल्ली - सेंट्रल कमांड ऑफिस 

रामशरण पांड्या साहेबाचे बूट चकाचक पॉलिश करत होता. काटेकोर व्यवस्थितपणाच दुसरं नाव म्हणजे मेजर शीलवर्धन कांबळे . पस्तीस वर्षाचा हा तरणाबांड ऑफिसर. अविवाहित. कारण त्याच पहिलं लग्न झालं होतं घड्याळाशी. दुसरं हातातल्या टॅबलेट पीसी शी. आणी तिसरं लग्न सतत जवळ असणार्‍या एस एल आर कॅमेर्‍याशी. चौथ्या बायकोला द्यायला त्यापाशी वेळ शिल्लक न्हवता.

अव्यवस्थितपणा खपवून घेतला जात नाही हे रामशरणला पक्कं ठावूक होतं.
सकाळी बरोब्बर ६ वाजून तीस मिनिटानी मेजर शिलवर्धन च्या टॅबलेट पीसी चा मॉर्नींग अलार्म भूणभुणत असे. पण त्याआधी एक सेकंद शिलवर्धनचे डोळे उघडलेले असत. तंतोतंत ६:३५ ला रामशरण बेड टी आणून देई. सकाळच्या सहा वाजून पंच्चावन्न मिनिटांनी; मेजर साहेब ब्रेकफास्टच्या टेबलावर हजर असत. तीन उकडलेली अंडी, कडक भाजलेले चार ब्रेड टोस्ट आणी १ मोठा मग भरून स्ट्राँग काळी कॉफी. गेली ३ वर्षे न्याहारीत किंवा वेळेत फरक पडलेला रामशरणने पाहिला न्हवता.

पाच मिनिटाच्या आत ब्रेड आणी अंडी संपलेली असत. त्यापुढचा मोजून अर्धा तास शीलवर्धनची बोटे टॅबलेट पीसी वर फिरत. विविध देशांच्या अनेक वर्तमानपत्रांच्या ई - पेपरचे झपाट्याने वाचन चालू असताना मे़जर ब्लॅक कॉफीचे घुटके घेत राहतो. त्यावेळी आवाज झालेला त्याला खपत नाही हे माहिती असल्याने रामशरण तो अर्धा तास बागेतल्या झाडाना पाणी घाली. साडे सात वाजता टॅबलेट पीसी पुन्हा भुणभुणायचा - त्यावेळी चकाचक पॉलिश केलेले बूट तयार ठेवणे हे रामशरण पांड्याच्या अंगळवणी पडले होते.

मेजर शीलवर्धन बूट चढवून खाड खाड पावले टाकत ऑफिसकडे चालू लागला. चालताना पहिल्यांदा टाच मग चवडा. बरोबर २३५० पावले चालून ; नेहमीप्रमाणे १२ मिनिटात तो ऑफिसला पोचला आणी सकाळी आठ वा़जण्याआधी काही मिनिटे त्याने कामाला सुरुवात केली. बरोबर एक वाजता तो खुर्चीवरून उठला. लंच साठी घरी जायला निघाला. ह्या प्रवासाला मात्र त्याला कधी २० मिनिटे लागत तर कधी एक तास.

वाटेतल्या झाडांचे, फुलांचे, कीटकांचे, दगडधोंड्यांचे फोटो काढत - काढत शीलवर्धन घरी जाई. वर्षानुवर्षे तोच रस्ता, तीच झाडं, तसलेच पक्षी. पण प्रत्येक फोटो मात्र निराळा. कधी छायाप्रकाशाचा खेळ तर कधी ऑब्सर्व्हर्ची जागा बदलेली. कधी ऋतु बदलेला. एकाच दगडाचे किती वेगवेगळे फोटो निघू शकतात हे पहायच असेल तर मेजरसाहेबांच्या घरच्या भिंती पहा ! एकच वस्तू वेगवेगळ्या द्रुष्टीकोनातून पहाणे हा शीलवर्धन चा छंद होता; आणी एकच घटना वेगवेगळ्या अंगाने समजून घेणे हा व्यवसाय ! ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी. अ‍ॅनालिसिस डिपार्टमेंट. इंटलिजन्स ब्यूरो.इंडियन आर्मी . 

हे सगळे फ़ोटो त्याने घरातल्या भीतिंवर फ्रेम करून लावले होते. रामशरण पांड्या ला सक्त ओर्डर होत्या सगळ्या फ़ोटो फ्रेम चकचकीत कायम ठेवणाच्या . त्या सगळ्या फ़ोटो फ्रेम पांड्या रोज साफ ठेवतो .  त्यातल्या एका फोटोचा अर्थ मात्र त्या भय्याला कळत नाही. शिलवर्धन  च्या वडिलांनी दिलेला तो आंबेडकरांचा  फोटो असतो. 

अ‍ॅनालिटिक बुद्धीमत्ता आणी सम्यक निरिक्षणक्षमता या त्याच्या गुणांमुळेच डायरे़क्टर श्रीवास्तवांनी त्याला आय बी त डेप्यूट केला होता. त्याआधी इंडो तिबेटियन रायफल फोर्स मधील त्याच्या कामाबद्दल त्याला, अतिविशिष्ट सेवा पदकानेही गौरवण्यात आले होते.

तो दिसायला काळासावळा, अंग़काठीने किरकोळ तर होताच. पण सैनिकी पेशात आवश्यक अशी .दमबाजी  किंवा      नेमबाजीही त्याला फारशी येत नसे. इंडो तिबेटियन रायफल फोर्स मधे त्याचं काम होतं पकडलेल्या दहशतवाद्याकडून माहिती वदवून घेणे. पण त्यान कधी कुणाला साधी कानफडित सुद्धा मारली नव्हती. दहशतवाद्याच्या मनसिकतेचा व्यवस्थित अभ्यास करून तो त्याला असे काही प्रश्न विचारी, की खच्चीकरण झालेला कैदी धडा - धडा बोलू लागे. मेजर शिलावर्धन कांबळे हा मानसशास्त्राचा अभ्यासक होता .

आज वाटेत एकही फोटो न काढता तो घरी पोचला. डोक्यात विचारांची चक्र फिरत होती. कारण  आजच त्याच्या हातात ट्रान्सफर लेटर पडलं होतं

ड्यु टी पोस्ट : बेळगाव
मराठा लाइट इंन्फेंट्री.

श्रीवास्तव साहेबांनी आपली बदली का केली असावी ? तीही बेळगावला ?

शिलावर्धन च्या हातातला टेब्लेट पीसी खणाणला - श्रीवास्तव साहेबाचा प्रयवेट आयडीवर मेल होता -  

Dear Shilvardhan ,

No more Questions . Two extremist organisations growing in Behelgum.   Report @ Maratha Lite infantry HQ. As False ID .  High command  don't  want communal politics till next election.   Interference , Trojan anything. Stop the nonsense .  Turn around time - 60 days . PDN.

**********************************************************************************************************

त्याच वेळी बेळगावच्या अल निरमा मशिदीत चांद्या पासून बांद्या पर्यंत आणि भटकळ पासून आशमगडपर्यंतचे मौलवी दाखल झाले होते . अहले हदीस  आणि जमाते इस्लामी मधल्या कड्व्यांचि बैठक बसलि होती . आवाज घुमला - नारा ए तकदीर - आलाहु अकबर ...

(क्रमश : )

पुढचा भाग लवकरच येत आहे …. 

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *